पाच वर्षांपूर्वी झालेली चूक सुधारायची आहे; शरद पवार यांचा नवनीत राणांवर निशाणा

अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी सोमवारी अमरावतीत महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत शरद पवार यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी तोफ डागली.

या सभेत शरद पवार म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी मी एक चूक केली होती. त्यासाठी मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. मागच्या वेळी एक चूक माझ्याकडून झाली अन् नवनीत राणा यांना पाठिंबा दिला. आता ती चूक कधी होणार नाही. ती चूक दुरुस्त करणार आहे. आता बळवंत वानखडे यांना विजयी करा, असे सांगायला मी आलो आहे. पाच वर्षांपूर्वी झालेली चूक आता सुधारायची आहे, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, आज या ठिकाणी मी आलोय ती एक गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी. मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. माझ्याकडून एक चूक झाली. पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली, तेव्हा त्या निवडणुकीतील उमेदवाराला मतदान करा म्हणून मी जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि ज्यांना पाठिंबा दिला, खासदार केलं. पण गेल्या पाच वर्षातील त्यांचा अनुभव पाहिल्यावर माझ्या मनात अस्वस्थता होती. की कधी तरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं आमच्याकडून चूक झाली. ती चूक पुन्हा कधी होणार नाही. ती चूक आता दुरुस्त करायची आहे. ती चूक दुरुस्त करण्यासाठी ज्याचं सार्वजिनक आणि व्यक्तिगत जीवन स्वच्छ आहे. अशा बळवंतराव वानखेडे यांना विजयी करा हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

जे संकट देशावर दिसत आहे त्यातून कशी मुक्तता होईल याचा विचार मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. या ठिकाणी आल्यावर मला अनेक जुन्या गोष्टी आठवतात. सार्वजनिक जीवनात कामाला सुरुवात केल्यानंतर मी तरुणांच्या चळवळीत सहभागी झालो. महाराष्ट्रभर फिरलो. पण अमरावती असं ठिकाण होतं तिथून तरुणांची एक शक्ती उभी राहिली आणि आम्हा सर्वांना काम करण्यासाठी अमरावतीकरांनी प्रोत्साहन दिलं, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाटचाल पुतीन यांच्या दिशेने होत आहे. मोदी यांच्या रुपात देशात नवा पुतीन तयार होत आहे. देशासाठी योगदान देणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर नरेंद्र मोदी टीका करतात. 10 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी काय केले, देशाचा काय विकास केला, याबाबत ते काहीच बोलत नाही. सध्या देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने होत आहे. जनताच आता ही हुकूमशाही उखडून फेकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.