![rupa ganguly](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/12/rupa-ganguly-696x447.jpg)
बी. आर. चोप्रा यांची ‘महाभारत’ ही पौराणिक मालिका प्रचंड गाजली. अगदी कोविड काळातही या मालिकेला जबरदस्त टीआरपी मिळाला. याच मालिकेमध्ये अभिनेत्री रुपा गांगुली यांनी द्रौपदीची भूमिका साकारली होती.
व्यावसायिक आयुष्यामध्ये प्रसिद्धीचे शिखर गाठत असताना त्यांचे खासगी आयुष्य मात्र खाचखळग्यांनी भरलेले राहिले. एक वेळ तर अशी आली होती की त्यांनी जीवनयात्रा संपवण्याचाही विचार केला होता. त्यांनी तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
रुपा गांगुली यांनी 1992 मध्ये ध्रुब मुखर्जी यांच्यासोबत लग्न केले. ते मॅकनिकल इंजिनियर होते. लग्नानंतर रुपा गांगुली यांनी पतीसाठी चित्रपटसृष्टीकडे पाठ फिरवली होती. पतीसोबत त्या कोलकाताला गृहिणी म्हणून राहू लागल्या.
लग्नानंतर 14 वर्षांनी दोघांमध्ये मतभेद होऊ लागले. त्यामुळे रुपा गांगुली यांनी पतीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आणि 2009मध्ये घटस्फोट घेतला.
2009 मध्ये एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रुपा गांगुली यांनी पती आपल्याला रोज खर्चासाठीही पैसे देत नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्या एवढ्या त्रस्त झाल्या होत्या की त्यांनी तीन वेळा आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला.
दरम्यान, रुपा गांगुली यांना एक मुलगा असून त्या आता एकट्याच राहतात. 2015मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2016मध्ये त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आले.