
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉपवर आहे, अशी माहिती नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एनसीआरबी अहवालातून समोर आली आहे. यावरूनच आता काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. भ्रष्टाचारात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशलाही मागे सोडलं, असं ते म्हणाले आहेत.
X वर एक पोस्ट करत विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत की, “महाराष्ट्राचा पारदर्शक कारभार इतका चकचकीत आहे की देशात महाराष्ट्राने शिखर गाठले आहे ते पण भ्रष्टाचारात. एनसीआरबी अहवालानुसार देशात भ्रष्टाचारात महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे आणि ते देखील सलग तीन वर्ष ही कामगिरी महाराष्ट्राने केली आहे. म्हणजे उत्तर प्रदेशला पण महाराष्ट्राने पाठी टाकले आहे.”
ते पुढे म्हणाले की, स्वच्छ आणि पारदर्शक कामाचा ढोल बडवणाऱ्यांना सरकारी प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांच्या कारभाराचे. अभिनंदन महाराष्ट्र सरकार, जोरदार प्रगती, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.