अवकाळी आणि गारपीट ग्रस्तांना वाऱ्यावर सोडले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खोके सरकारचा पळ

राज्यातील दुष्काळाने 6 लाख 35 हजार हेक्टर बाधित झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आहे. अजून पंचनामे झाले नाहीत. शेतकरी अक्षरशŠ हवालदिल झाला आहे. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करा अशी मागणी विधानसभेत विरोधी पक्षाने केली. मात्र विधानसभा अध्यक्षांनी ती फेटाळल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शेतकरीविरोधी सरकारचा धिक्कार करत सभात्याग केला. तर महाविकास आघाडीच्या आमदारांनी कापसाच्या माळा घालून विधान भवनाच्या पायऱ्यांवरही धरणे देत हल्लाबोल केला. ‘सरकार घेते फक्त टक्केवारी, शेतकऱ्यांच्या हातावर देते तुरी’, ‘अवकाळीने निघते शेतकऱ्यांचे दिवाळे, गद्दारांना लागले मंत्रिमंडळ विस्ताराचे डोहाळे,’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरले. अवकाळी व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत. सरकारने सूचना देऊनही अधिकारी ऐकत नाहीत, असे वडेट्टीवार म्हणाले. स्थगन प्रस्तावद्वारे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणण्याची मागणी त्यांनी केली. त्याला विरोधी पक्षातील इतर सदस्यांनीही दुजोरा दिला.

राज्यात अवकाळीने पीक गमावले. आता नाशिक परिसरात कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. तरीदेखील चर्चा करू, असे सरकार मोघम उत्तर देत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

सरकारने एक रुपयाचा विमा उतरवला. फायदा कोणाचा झाला? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. पीकविमा कंपन्यांना कोटय़वधींचा फायदा होणार पण शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडलेले नाही, सरकारला लाज वाटली पाहिजे अशा शब्दात त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. काही शेतकऱ्यांनी आपले अवयव विकायला परवानगी मागितली तरी सरकारला जाग नाही. राज्यातील शेतकरी पीक कर्ज परत करू शकत नाही. कांद्यावरील निर्यात बंदी उठवली नाही. नाशिक पट्ट्यात पाऊस झाला द्राक्ष पीक वाया गेले. तिथे देखील शेतकऱ्यांना मदत नाही. नाशिक महामार्ग शेतकऱ्यांनी  रस्ता रोको सुरू केला आहे. शेतकरी रस्त्यावर बसला आहे. शेतकरी कसा जगणार. व्यापाऱ्यांनी हात वर केले आहेत. हे लक्षात घेता यावर चर्चा करावी लागेल, अशी मागणी  वेडेट्टीवार यांनी केली. पण विधानसभा अध्यक्षांनी ती फेटाळली

कृषीमंत्री भुसे यांच्या दाव्यानंतर गदारोळ

कृषीमंत्री दादा भुसे यांनी अवकाळीग्रस्त भागांचे सर्व पंचनामे पूर्ण केले आहेत आणि शेतकऱ्यांना सरकारकडून मदत केली जात आहे असा दावा यावेळी केला. त्यावर आक्षेप घेत विरोधकांनी सभागृहात गदारोळ घातला. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध असो अशा जोरदार घोषणा सभागृहात दिल्या.