माणिकगड सिमेंट जमिन प्रकरण चिघळले; मोबदला आणि जमिनीच्या मागणीसाठी पाच आदिवासींनी केले विषप्राशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा उपविभागांतर्गत येणाऱ्या कोरपना तालुक्यातील माणिकगड सिमेंट कंपनीच्या (अल्ट्राटेक) चुनखडी क्षेत्रात कुसुंबी येथील कोलाम बांधवांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या. मात्र याचा योग्य मोबदला अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे जमिनी परत कराव्या, या मागणीसाठी गेल्या 15 वर्षांपासून या आदिवासींचा लढा प्रशासकीय पातळीवर आणि मानिकगड सिमेंट कंपनीसोबत सुरू आहे.

सतत पाठपुरावा करूनही हा वाद निकाली न निघाल्याने अखेर पाच आदिवासी शेतकऱ्यांनी राजुरा उपविभागीय अधिकारी रविंद्र माने यांच्या कार्यालयात विषप्राशन केले. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून राजुरा पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाचही आदिवासी शेतकऱ्यांना तातडीने राजुरा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. या सर्वांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात हलवण्यात करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

लचु चिन्नु आत्राम, जयराम गगुं कुडमेथे, जंगु पेंदोर, बालाजी सिडाम आणि मारोती तलांडे अशी विषप्राशन केलेल्या शेतकऱ्यांची नावे असून त्यांची प्रकृति चिंताजनक आहे.