मनोज जरांगे 4 जूनपासून पुन्हा उपोषण करणार

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच अर्थात 4 जूनपासून मनोज जरांगे – पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. राज्य सरकारने दिलेल्या दहा टक्के आरक्षणाचा मराठा समाजाला कवडीचाही फायदा होत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, 8 जूनला नारायणगड येथे जाहीर सभा होणार असल्याचेही त्यांनी दिली.

छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मनोज जरांगे हे शहरात आले होते. बुलंद छावा संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोज जरांगे यांनी उपोषणाबद्दल माहिती दिली. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी लढा उभारला आहे. राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण देऊन मराठय़ांची फसवणूकच केली. या आरक्षणाचा समाजाला कोणताही फायदा होत नाही. मुळात हे सरकारचे आरक्षण अद्याप लागूच झालेले नाही. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षणाच्या मागणीवर आपण ठाम असून त्यासाठी 4 जून रोजी आंतरवालीत बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.

फडणवीसांमुळेच मोदींवर वणवण करण्याची वेळ

मराठा आरक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठा समाजाने झुकवले आहे. पंतप्रधानांना एकेका जिह्यात तीन तीन सभा घ्याव्या लागत आहेत. महाराष्ट्रात ते घोंगडी घेऊनच आले होते, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. मोदी पत्रकारांशी बोलले नाहीत, पण तासन्तास भाषणं मात्र त्यांनी ठोकली. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच मोदींवर वणवण करण्याची वेळ आल्याचा आरोप जरांगे यांनी केला.

…तर विधानसभा लढवणार

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारने सोडवला नाही तर आगामी विधानसभा निवडणूक ताकदीनिशी लढवणार असल्याची घोषणाही यावेळी जरांगे यांनी केली. विधानसभेच्या 288 जागा लढवल्या जातील. समाजातील सर्व जातीमधील गोरगरीबांना प्रस्थापितांच्या विरोधात उभे करण्यात येईल. प्रस्थापित तीन टक्के मराठा समाजाला बाजूला सारून ही निवडणूक लढवली जाईल, असेही ते म्हणाले.