
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार सुरू असतानाच गुरुवारी सकाळपासून मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पालघर आणि रायगडसह राज्यातील अनेक भागात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. नंदूरबार, अहिल्यानगर आणि सातारा जिह्यात अनेक ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह पाऊस कोसळला आहे. पालघर जिह्यात मुसळधार पाऊस पडल्याने अनेक भागात अतिवृष्टी पाहायला मिळालीय. नाशिकमध्ये धुवाँधार पाऊस बरसल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली असून नदीला मोठा पूर आला आहे. खेड शहर बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले असून येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे दापोली नाका रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. नंदूरबार आणि रायगडमध्ये तीन तासांहून अधिक वेळ धुवाँधार पाऊस कोसळल्याने पाताळगंगा, कुंडलिका नदीला पूर आला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्हा प्रशासनाने गुरुवारी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. वाडा-भिवंडी महामार्गाचा काही भाग पावसामुळे खचल्याने या ठिकाणी वाहतूककोंडी पाहायला मिळाली आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी जिह्यातील खेड, दापोली, मंडणगड तालुक्यात पावसामुळे नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज असल्याने पुढचे 12 तास हे पावसाचे असणार आहेत. हवामान खात्याने मुंबई आणि पालघरसाठी रेड अलर्ट दिला आहे.
नागोठण्याला पुराचा वेढा
बुधवारी रात्रीपासून तुफान कोसळत असलेल्या पावसाने गुरुवारी सकाळपासूनच अंबा व कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली. अंबा नदीचे पाणी पाली तसेच नागोठणे शहरात घुसले. नागोठणे एसटी स्थानक, मुख्य बाजारपेठेत पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. रोहे शहराला पुराचा तडाखा बसला नसला तरी दुथडी भरून वाहणाऱ्या कुंडलिका नदीने रौद्र रूप धारण करत नागोठणे-रेहे मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला.
नाशिकमध्ये कार पुरात अडकली
नाशिक येथे गुरुवारी गोदावरी नदीला या मोसमातील पहिला पूर आला असून, पात्रातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. गोदावरी नदीची पाणी पातळी वाढल्याने संत गाडगे महाराज पुलाखालील कार पुरात अडकली.
जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
जगबुडी नदी दुथडी भरून वाहत असून पुराचे पाणी खेड शहरात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जगबुडी नदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून जगबुडी नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या वर आहे. नदीने 9.90 मि पाणी पातळी गाठली आहे.
लोणावळ्यात धबधबे ओसंडले
लोणावळा परिसरात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे. लोणावळा, खंडाळा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून गुरुवारी 221 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दिवसभर पावसाची संततधार सुरुच होती. गेल्या पाच दिवसात लोणावळ्यात तब्बल 734 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर, आज अखेरपर्यंत 1166 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पर्यटकांच्या पसंतीचे व तुलनेत कमी क्षमतेचे भुशी धरण भरले असून धरणाच्या पायऱ्यांवरून अतिशय वेगाने पाणी वाहत असल्याने त्या भागात पर्यटकांनी जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परिसरातील धबधबेही ओसंडून वाहू लागले आहेत. इंद्रायणी नदीच्या पातळीतही कमालीची वाढ झाली आहे.
पवना धरण परिसरात पावसाचा जोर
पिंपरी – चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मागील 24 तासात 87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. धरणात सध्या एकूण 37 टक्के पाणीसाठा झाला आहे. वडीवळे धरणामध्ये 65 टक्के पाणीसाठा झाला आहे. कासारसाई धरणामध्ये 55.85 टक्के, तर आंद्रा धरणात 44.85 टक्के पाणीसाठा झाला आहे. जोरदार पावसामुळे मावळातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.
महाबळेश्वरला पावसाने झोडपले
महाबळेश्वरला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून नागरिकांची व पर्यटकांची दैना उडाली आहे. शहर व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तापोळा रस्ता चिखली गावच्या हद्दीत वाहून गेला असून रस्त्यावर दरडी कोसळल्या आहेत. दरम्यान दरड कोसळलेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड माती काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.