
पावसामुळे मंत्रालयात गुडघाभर पाणी साचले. त्यावरून महायुती सरकारवर टीका होत आहे. मंत्रालय नव्हे भ्रष्टाचारी फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेले, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत पाणी पोहोचणे हे फक्त पावसाचे नव्हे, तर सरकारच्या उदासीनतेचे दर्शन आहे. निसर्ग स्वतःच सरकारला सावध करत आहे, असे पटोले म्हणाले.
कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील सरकार मुंबई स्वच्छ करू शकत नाही, चांगले रस्ते करू शकत नाही, ड्रेनेज सिस्टीम सुधारू शकत नाही. नद्यांमधील कचरा काढण्याच्या बहाण्याने कोट्यवधी रुपये लुटले जातात हे विदारक दृश्य आहे. हा सरकारचा बेशिस्त कारभार आहे, असा हल्लाबोल पटोले यांनी केला.