
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातच त्यांच्याच पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्याचा खून करण्यात आला आहे. भूमाफियांनी हा खून केला असून पाटील यांनी अनेक भुखंड घोटाळे समोर आणले होते. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या खुनामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. आता नागपुरातही जिल्हा परिषदेचे सदस्य आणि भाजप नेते अतुल पाटील यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. पाटील यांनी अनेक भुखंड घोटाळे समोर आणले होते. त्यांनी सरपंच विष्णू कोकड्डे यांच्यावरही जमिनीच्या घोटाळ्यांचा आरोप केला होता.
या जिल्हा परिषदेची लवकरच निवडणूक होऊ घातली आहे. पाटील यांच्या खुनामुळे तालुक्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. एका आरोपीचे नाव हिमांशू कुंभाळकर तर दुसरा आरोपी हा विष्णूद कोकड्डे आहे.
पोलीस सूत्रांनुसार, पाटील यांनी माहितीच्या अधिकाराचा (RTI) वापर करून बनावट कागदपत्रांचा शोध लावला होता, जे वापरून अनधिकृत भूखंड तयार करण्यात आले होते. त्यांच्या तक्रारींमुळे ग्रामपंचायत सचिव कोकड्डे आणि इतरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. असा आरोप आहे की कोकड्डे आणि त्यांची पत्नी, माजी नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष मुकताबाई कोकड्डे, यांनी आपला राजकीय प्रभाव वापरून बनावट ना हरकत प्रमाणपत्रे (NOC) तयार केली आणि बेकायदेशीर जमीन व्यवहारांमधून कोट्यवधी रुपये कमावले.
खापरखेडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद कटलाम यांनी सांगितले की कुम्भाळकरने जुन्या वादात सामोरा जाण्याच्या बहाण्याने पाटील यांना घराबाहेर बोलावले. पाटील बाहेर आले तेव्हाच त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. थोडा वेळ झटापट झाली, पण कुम्भाळकरने पाटील यांच्यावर अनेक वेळा चाकूने वार केले.
पाटील यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, पण तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दोघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. कुंभाळकरला 21 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला असून कोकड्डेला 19 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, जेणेकरून पुढील चौकशी करता येईल.