रुग्णालये कॉर्पोरेट मशीनप्रमाणे काम करत आहेत; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

देशातील राज्यस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहेत. या राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया संपणार आहे. या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. या पाच राज्यातील रणधुमाळी आणि मतदान प्रक्रिया संपल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या वायनाड या मतदारसंघात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशातील अनेक रुग्णालये कॉर्पोरेट मशीन म्हणून काम करत आहेत. हा चांगला ट्रेंड नाही, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

राष्ट्रीय स्तरावर आरोग्य सेवेबाबत वेगळा विचार करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने गरीब लोकांना अत्यंत कमी खर्चात आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी. आम्ही राजस्थानमध्ये या दिशेने काम केले आहे. 2024 मध्ये आम्ही सत्तेत आलो तर देशभरात असे उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करू, असेही राहुल गांधी यांनी सांगितले. राहुल गांधी सध्या केरळ दौऱ्यावर आहेत. नामपल्ली येथे मंगळवारी राहुल गांधी म्हणाले होते की, देशातून द्वेष दूर करणे हे माझे ध्येय आहे. द्वेष संपवण्यासाठी केंद्रात नरेंद्र मोदींचा पराभव करणे आवश्यक आहे. कट्टरवाद्यांनी संपूर्ण देशात द्वेष पसरवला आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

भारत जोडो यात्रेत आपण द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडण्याचे वचन दिले होते, असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधानांविरुद्ध लढत असल्यामुळे आपल्यावर 24 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच माझे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. असे असले तरी आमचा लढा सुरूच राहणार आहे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.