निवृत्तीनाथ महाराज दिंडीच्या आगमनाने नाशिकनगरीत भावभक्तीची पर्वणी, हजारो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ

वैष्णवांचा गजरू आनंदे हेलावली सृष्टी... आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे निघालेली संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी रथासह दिंडीचे गुरुवारी नाशिक शहरात आगमन झाले. (सर्व छायाचित्र: भूषण पाटील)

आषाढी वारीनिमित्त त्र्यंबकेश्वर येथून भूवैकुंठ पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी रथासह दिंडीचे गुरुवारी नाशिकनगरीत आगमन झाले. यामुळे शहर व परिसराने विठ्ठलभक्तीची पर्वणी अनुभवली. टाळ-मृदंगासह संत-हरिनामाच्या जयघोषाने नाशिक भक्तिरसात न्हाऊन निघाले. ठिकठिकाणी पालखी रथावर पुष्पवृष्टी करीत हजारो नाशिककरांनी नाथांचे मनोभावे दर्शन घेतले. पंचायत समिती कार्यालय आवारात महापालिका आणि निवृत्तीनाथ महाराज सामाजिक सेवा संस्थेतर्फे दिंडीचे स्वागत करण्यात आले.

श्री विठ्ठल भेटीच्या ओढीने परंपरेनुसार त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर येथून मंगळवारी नाथ पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. या पालखीसोबत साठ दिंड्यांमधून हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. त्यांचा पहिला मुक्काम पेगलवाडीतील नाथांच्या गुरूगृही महानिर्वाणी आखाड्यात होता. दुसर्‍या दिवशी बुधवारी सातपूर गावात मुक्कामी थांबल्यानंतर पहाटेच वैष्णवांची पाऊले नाशिक शहराच्या दिशेने मार्गक्रमण करू लागली. ठिकठिकाणी भाविकांनी नाथांच्या दर्शनाचा लाभ घेतला. शेकडोंच्या संख्येने वारकरी दिंडीत सहभागी होत होत हा भक्तिसागर शहरात पोहोचला.

नाशिककरांच्या वतीने महापालिका आणि निवृत्तीनाथ महाराज सामाजिक सेवा संस्थेने दरवर्षीप्रमाणे पंचायत समिती आवारात दिंडीचे स्वागत केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांच्या हस्ते वीणेकरी, तुळसधारी महिलांचा सन्मान करण्यात आला. वारीत सहभागी वारकर्‍यांच्या दर्शनाने पांडुरंगाचे दर्शन झाल्याची भावना प्रवीण गेडाम यांनी व्यक्त केली. महंत भक्तिचरणदास महाराज, निवृत्तीनाथ महाराज संस्थान अध्यक्ष सोमनाथ घोटेकर यांनीही मनोगत मांडले. पालखी मार्गावर दिंडीला आवश्यक सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.

जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी वारकर्‍यांसोबत टाळ वाजवत हरिनामाचा जयघोष केला. माजी नगरसेवक तानाजी जायभावे यांनी वारकर्‍यांना टाळ भेट दिले. या आवारात अल्पोपहार झाल्यानंतर वारकर्‍यांची वैद्यकीय पथकाने आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधे दिली.

यावेळी पालखीचे मानकरी ह.भ.प. बाळासाहेब देहूकर, मोहन महाराज बेलापूरकर, जयंत महाराज गोसावी, बाळकृष्ण महाराज डावरे, पालखी सोहळा प्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे, माधव राठी महाराज, कांचन जगताप, नीलेश गाढवे, अमर ठोंबरे, श्रीपाद कुलकर्णी, बाळासाहेब सानप, निवृत्तीनाथ महाराज सामाजिक सेवा संस्थेचे पद््माकर पाटील, सचिन डोंगरे, रत्नाकर चुंभळे, पुंडलिक थेटे, राजेंद्र जुन्नरकर, त्र्यंबकराव गायकवाड, गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे आदी उपस्थित होते.

ठिकठिकाणी स्वागत

नाशिककरांनी पालखी दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत केले. रविवार कारंजासह अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. जुने नाशिकमधील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात पालखी दुपारी विसावली. येथेच वारकर्‍यांनी भोजन करून विश्रांती घेतली. त्यानंतर दिंडी गणेशवाडीतील आयुर्वेद रुग्णालय परिसरात मुक्कामाच्या तळावर पोहोचली. उद्या शुक्रवारी दिंडीचा पुढचा प्रवास सुरू होईल. दुपारी मुक्तिधाम येथे भोजन व चेहेडीत काही वेळ विश्रांती करून पालखी पळसेत मुक्कामी असणार आहे.