समृद्धीवर सुविधांची वानवा, दीडशे किलोमीटरपर्यंत ना पंक्चरचे दुकान ना पेट्रोलपंप ना हॉटेल

मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण गेल्या तीन दिवसांपूर्वी पार पडले असले तरी या महामार्गावर सेवा आणि सुविधांची मात्र वानवा निर्माण झाली आहे. दीडशे किलोमीटरपर्यंतच्या अंतरात कुठेही पंक्चरचे दुकान, पेट्रोलपंप, हॉटेल आणि स्वच्छतागृह नाही. त्यामुळे वाहनचालकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. या महामार्गावरील रात्रीचा प्रवास जिकिरीचा आणि धोकादायक ठरणार आहे.

मुंबई-नागपूर प्रवास अतिजलद व्हावा यासाठी 701 किलोमीटरचा नवीन समृद्धी महामार्ग अंदाजे 55 हजार कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे. यां महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी हा 11 मे 2022 रोजी सुरू करण्यात आला. त्यानंतर दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर हा 26 मे 2023 रोजी सुरू झाला. नंतर भरवीर ते इगतपुरी हा चौथा टप्पा 4 मार्च 2024 रोजी सुरू करण्यात आला. शेवटचा पाचवा टप्पा इगतपुरी ते आमने (भिवंडी) हा 5 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आला.

या महामार्गावर तब्बल 150 किलोमीटर अंतरात प्रवाशांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. किमान 35 ते 40 किलोमीटरच्या अंतरावर स्वछतागृह, हॉटेल, पेट्रोलपंप, गॅरेज, टायर दुकान असणे गरजेचे होते. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

पाणी, बिस्किटे, फळे जवळ ठेवा
समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना आपली वाहने अपडेट ठेवावी लागणार आहेत. वाहनात पेट्रोल, डिझेल, गॅस व चार्जिंग यांसह गाडीचे टायर अन्य बाबी घेतल्यानंतर या महामार्गावरून प्रवास सुरू करता येणार आहे. आपल्या वाहनात पिण्याचे पाणी, सुकामेवा, बिस्किटे, फळे सोबत घेतल्यानंतरच आपले वाहन समृद्धी महामार्गावर आणावे लागणार आहे. या महामार्गावर सुविधा उपलब्ध नसल्याने वाहनचालक आणि प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.