
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणासंदर्भात विचारलेला प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या कोर्टात टाकला. एकत्रीकरण – हा काय माझा निर्णय नाही. कोण कुठे जाणार आहे, हा पक्षाचा निर्णय आहे. पवार साहेबांचे राजकारण सगळ्यांना माहीत आहे. पवार साहेब लोकशाही मार्गाने निर्णय घेतात. यासंदर्भात मी सगळ्यांशी चर्चा करेन. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे ते मला कळेल, असे सुळे म्हणाल्या.
बारामतीमध्ये सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलत होत्या. आज संपूर्ण पवार कुटुंब बारामतीत असल्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, या प्रश्नाचे उत्तर खुबीने टाळत त्या म्हणाल्या, मी तरी बारामतीत आहे, कोणते पवार कुठे आहेत मला माहीत नाही. मी इथून इंदापूरला जाणार आहे, असं त्यांनी मिश्किलपणे सांगितलं.
माळेगाव कारखाना निवडणुकीसंदर्भात आज बैठक असून, आम्हाला या निवडणुकीत राजकारण आणायचं नाही. आम्ही शेतकरीहिताचा योग्य निर्णय घेऊ, अशी माहिती त्यांनी दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रासंदर्भात सुप्रिया सुळे म्हणाल्या, राहुल गांधींनी एक लेख लिहिला होता. त्यापूर्वी त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. राहुल गांधी यांनी जे पत्र लिहिलं आहे, त्याची निवडणूक आयोगाच्या उत्तराची आम्हाला प्रतीक्षा आहे. राहुल गांधी आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे.