
तुम्ही जे केले ते अभूतपूर्व, अकल्पनीय आणि अद्भुत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांच्या कामगिरीचे काwतुक केले. पाकिस्तानने आदमपूर हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचा खोटा दावा केला होता. त्या तळावर जाऊन पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा दिला.
पाकिस्तानी सैन्याला हिंदुस्थानच्या लष्करी तळाचे नुकसान करता आले नाहीच परंतु, जर पाकिस्तानच्या जमिनीवर दहशतवाद कायम राहिला तर त्यांचा देश नष्ट होईल, असा संदेशही त्यांनी पाकिस्तानला दिला. पंतप्रधानांनी हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांचे कौतुक केले तसेच या घोषणेची ताकद जगाने पाहिली, जेव्हा आपल्या माता-भगिनींचे कुंकू पुसण्यात आले तेव्हा दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना मारले, दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यांनी पाकिस्तानची झोप उडाली, असे पंतप्रधान म्हणाले. यापुढेही दहशतवादी कारवाया झाल्या तर पाकिस्तानात घुसून मारू, असा इशाराही मोदी यांनी दिला.
‘भारतमाता की जय’ केवळ घोषणा नाही
भारतमाता की जय ही केवळ घोषणा नाही तर देशातील प्रत्येक जवानाची शपथ आहे. जे जवान भारत मातेच्या सन्मान आणि प्रतिष्ठेसाठी जीवाची बाजी लावतात. हे जवान जेव्हा भारत माता की जय बोलतात तेव्हा दुश्मनांचा थरकाप उडतो. जेव्हा आपले क्षेपणास्त्र अचूक लक्ष्य भेदते तेव्हा दुश्मनांनाही भारत माता की जय ही घोषणा ऐकू येते, असे मोदी म्हणाले.
आदमपूर एअरबेस उडवल्याचा पाकिस्तानचा होता दावा
हिंदुस्थानी लष्कराचा एस 400 क्षेपणास्त्र अर्थात सुदर्शन चक्रप्रणाली आणि आदमपूर एअरबेस उडवल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. परंतु, याच एअरबेसवर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना संबोधित केले. पंतप्रधानांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या भेटीनंतरचे फोटोही शेअर केले.