जोगेश्वरीत बिऱ्हाड मोर्चावर पोलिसांचा लाठीहल्ला, रेल्वेजवळ असलेल्या झोपडीधारकांचा पुनर्वसनासाठी मोर्चा

जोगेश्वरी पूर्वला रेल्वेजवळ असलेल्या शेकडो झोपडीधारकांनी आज सकाळी रेल्वे प्रशासनाविरोधात बिऱ्हाड मोर्चा काढून पुनर्वसनाची मागणी केली. मात्र, या मोर्चाला पोलिसांनी मध्येच थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांवर झालेल्या लाठीमारात काही आंदोलक जखमी झाले.

जोगेश्वरी पूर्व, सुभाष रोड येथे रेल्वेलगत असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या झोपडीधारकांनी आज सकाळी 11 च्या सुमाराला बिऱहाड मोर्चा काढण्यात आला. रेल्वेने झोपडीधारकांवर अन्याय करू नये आणि योग्य पुनर्वसन करावे, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि लहान मुलांचाही सहभाग होता. मात्र, मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करत आंदोलकांना ताब्यात घेतले.

आधी पुनर्वसन करा!

आम्ही कोणत्याही प्रकारे हिंसा केली नाही. आम्ही फक्त आमच्या हक्कांसाठी आणि पुनर्वसनाच्या मागणीसाठी शांततापूर्ण मार्गाने मोर्चा काढला होता. मात्र, पोलिसांनी लाठीमार केला. आमचे आधी पुनर्वसन करा. आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला आहे.