
ऐतिहासिक पतितपावन मंदिरातून भजनीबुवांना भाजप नेते अॅड. बाबा परुळेकर यांनी रोखल्यानंतर रत्नागिरीत वातावरण पेटले होते. भजनीबुवांनी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार करूनही रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश शिवरकर यांनी गुन्हा दाखल केला नाही. उलट भजनीबुवांच्या अर्जाला केराची टोपली दाखवली आहे. शहर पोलीस निरीक्षकांचा भाजप नेते अॅड. बाबा परुळेकर यांना वाचवण्याचा अट्टहास असल्याबाबत आरोप होत असून भजनीबुवांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची भेट घेऊन शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांनी गुन्हा दाखल न केल्याची तक्रार केली आहे.
भागोजीशेठ कीर यांनी पतितपावन मंदिर उभारून मंदिर सर्व धर्मीयांसाठी खुले केले होते. सर्व धर्मीयांसाठी खुले केलेले देशातील हे पहिले मंदिर होते. त्याच पतितपावन मंदिरात 26 एप्रिल रोजी भजनासाठी गेलेल्या भजनीबुवांना भाजप नेते अॅड. बाबा परुळेकर यांनी अटकाव केल्याची तक्रार भजनीबुवांनी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे केली होती. मात्र रत्नागिरी शहर पोलिसांकडून त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
नवीन पोलीस अधीक्षकांकडून अपेक्षा
रत्नागिरीत नूतन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची भजनीबुवांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट घेऊन 26 एप्रिल रोजी पतितपावन मंदिरात झालेला प्रकार सांगितला. भजनीबुवांनी निवेदनही दिले आहे. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केल्यानंतरही रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश शिवरकर यांनी भाजप नेते अॅड. बाबा परुळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. आपण शहर पोलीस निरीक्षकांना कायदेशीर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी भजनीबुवा आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी राजीव कीर, काwस्तुभ नागवेकर, साईनाथ नागवेकर, संजय मेस्त्राr व इतर उपस्थित होते. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिले आहे.