![vardha](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/05/vardha-1-696x447.jpg)
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 येथील नांदगाव चौक येथे उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलाला मधोमध मोठे भगदाड पडले आहे. या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाला पडलेल्या भगदाडामुळे भाजपच्या विकासाची पोलखोल झाली आहे. भाजप सरकारच्या काळात निर्माण झालेल्या कश्मीर ते कन्याकुमारी या महामार्गावरील हा मोठा उड्डाण पूल आहे. या मोठ्या उड्डाण पुलावर मोठे भगदाड पडल्याने या महामार्गावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. या मार्गावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे.
वर्ध्याच्या हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्ग 44 वरील कृषी उत्पन्न बाजार समिती ते सेंट जॉन कॉन्व्हेंटपर्यंत उड्डाणपुल मागील तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला आहे. त्यानंतर वाहतुकीसाठी सुरू झालेला हा उड्डाणपूल दुरुस्तीसाठी अनेकदा बंद करून वाहतूक दुसऱ्या रस्त्याने वळवण्यात आली होती. या काळात पुलाची डागडुजी करण्यात आली. मात्र, आता या उड्डाण पुलाच्या मोठे भगदाड पडले आहे. याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यामुळे भाजपच्या विकासाच्या कामाची पोलखोल होत आहे.
उड्डाणपूलाला मधोमध भगदाड पडल्याने पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या भगदाडामुळे पलावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या पूलाचे उद्घाटन केंद्रीय रस्तेवाहातूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, पूलाला तीन वर्षातच मोठे भगदाड पडल्याने याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.