
पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून 2 हजार क्यूसेक पाणी सोडले जात असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नदीकाठी न जाण्याचा आणि नदीपात्रात उतरु नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
खडकवासला धरण परिसरात सतत पाऊस सुरू आहे. यामुळे धरणातील पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. यामुळे धरणातून 2 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पावसाचा जोर लक्षात घेता पाणी विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आला आहे. तसेच जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश दिले आहेत.
मावळ, लोणावळा, कामशेत आदि भागांतही पावसाचा जोर कायम आहे. आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिर परिसरातील भक्तीसोपान पुलाचे रेलिंग पावसामुळे तुटून वाहून गेले आहे. हवामान विभागाने पुढील 24 तास पुणे आणि सातारा घाट परिसरात ऑरेंट अलर्ट जारी केला आहे.