मोदी सरकारची 11 वर्ष म्हणजे फक्त प्रचार, मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातावरून राहुल गांधी यांची टीका

मोदी सरकारची 11 वर्ष म्हणजे फक्त प्रचार आहे अशी टीका काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या जखमी प्रवाशांसाठी त्यांनी प्रार्थनाही केली आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले आहे की, मोदी सरकार आपल्या सरकारची 11 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद साजरा करत आहे. आणि दुसरीकडे मुंबईजवळ झालेल्या लोकलच्या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. भारतीय रेल्वे कोट्यवधी जनतेचा जगण्याचा आधार आहे. पण आता हीच रेल्वे असुरक्षितता, गर्दी आणि अव्यवस्थेचं प्रतीक बनलंय.

मोदी सरकारची 11 वर्ष म्हणजे ना जबाबदारी, ना बदल फक्त प्रचार. सरकार 2025 बद्दल बोलणं सोडा आता 2047 ची स्वप्न विकत आहे. आज देशाची काय अवस्था आहे याकडे कोण पाहणार? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहेत.
तसेच मी मृतांच्या कुटुंबीयांशी संवेदना व्यक्त करतो आणि जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे होवो अशी प्रार्थना करतो असेही राहुल गांधी म्हटले आहे.