ज्यांच्याकडून उत्तर हवं होतं, तेच पुरावे नष्ट करताहेत! निवडणुकीचं फुटेज 45 दिवसांत नष्ट करण्याच्या निर्णयावरून राहुल गांधींनी EC ला घेरलं

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी दैनिकाला लेख लिहून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहारांची सखोल मांडणी केली होती. निवडणूक आयुक्तांच्या निवडीपासून मतदार यादी घोटाळा आणि पुराव्यांच्या लपवाछपवीपर्यंत त्यांनी लेखात सविस्तर आढावा घेतला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे घोटाळे केले गेले, भाजपने ही निवडणूक कशी चोरली यासाठी राहुल गांधींनी पाच महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. हा प्रकार ‘मॅच फिक्सिंग’ असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या निवडणुकीचे फोटो आणि फुटेज एक वर्षाऐवजी 45 दिवस संग्रहित ठेवण्याच्या निर्णयावरून हल्लाबोल केला आहे.

हे वाचा – निवडणुकीचे फुटेज आता 45 दिवसांत नष्ट करणार, आयोगाचे सर्व राज्यांना फर्मान

राहुल गांधी यांनी एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या बातमीचा स्क्रीनशॉट आपल्या एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवरून शेअर करत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर हल्ला चढवला. ‘मतदार यादी? मशीन-रीडेबल स्वरुपात दिली जाणार नाही. सीसीटीव्ही फुटेज? कायदा बदलून लपवण्यात आले. निवडणुकीचे फोटो आणि व्हिडीओ? आता ते एक वर्ष संग्रहित ठेवणार नाहीत, तर 45 दिवसात नष्ट करणार. ज्यांच्याकडून उत्तर हवे होते, तेच पुरावे नष्ट करत आहेत. यावरून हेच स्पष्ट होतंय की मॅच फिक्स आहे. आणि फिक्स केलेली निवडणूक ही लोकशाहीसाठी विष आहे’, असे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.