हा अपघात नाही ही एका बेजबाबदार सरकारने केलेली हत्या, राहुल गांधी यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत खोदून ठेवलेल्या रस्त्याच्या खड्ड्यात पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे एका बांधकामाच्या ठिकाणच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडून एका कारचालकाचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनांवरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ”हा अपघात नाही ही एका बेजबाबदार सरकारने केलेली हत्या’ अशी टीका त्यांनी Xवर केलेल्या पोस्टमधून केली आहे.

हिंदुस्थानात पसरलेल्या भ्रष्टाचार, स्वार्थीपणा आणि निष्काळजीपणाच्या साथीने आज आणखी एका तरुण बळी घेतला. एक मुलगा, एक स्वप्न, आई वडिलांचं संपूर्ण जग एका झटक्यात सर्व उद्ध्वस्त झालं. हा अपघात नाही, ही हत्या आहे, आणि ही त्या एका रस्त्याने नाही तर बेजबाबदार सरकारने केली आहे. कारण इथे ना राजीनामे घेतले जात, ना शिक्षा दिली जाते, ना कुणाची अंतरात्मा जागी होते. इंदूरचे विषारी पाणी, नोयडाच्या युवराजचा मृत्यू, कोसळणारे पूल, ट्रेन अपघात, गुमरवणारे प्रदुषण… या कसलीच जबाबदारी घेतली जात नाही. जो पर्यंत कुणी याची जबाबदारी घेत नाही, याचे उत्तर देत नाही तोपर्यंत कुणाचा ना कुणाचा बळी जातच राहणार आहे’, असे राहुल गांधी यांनी पोस्ट केले आहे.

दिल्लीतील जनकपूरी येथे जलविभागाने खोदून ठेवलेल्या भल्यामोठ्या खड्ड्यात पडून एका बाईकस्वाराचा मृत्यू झाला आहे. कमल असे त्या तरुणाचे नाव असून तो 25 वर्षांचा होता. गुरुवारी रात्री कामावरून परत येत असताना कमलला रोहिनी भागात जलविभागाने खोदून ठेवलेला खड्डा दिसला नाही व त्याची बाईक त्या खड्डयात पडली. यात त्याचा मृत्यू झाला.