
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण देशात आणि जगभरात निषेध व्यक्त झाला. कश्मीरमधील अतिरेक्यांची घरे स्फोटाने उडवून देण्यात आली, पण ज्या लोकांच्या धोरणांमुळे दररोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत, तेसुद्धा अतिरेकीच आहेत, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
परभणीच्या माळसोन्ना गावामध्ये सचिन आणि ज्योती जाधव या शेतकरी दाम्पत्याने कर्जामुळे आत्महत्या केली होती. सरकारपर्यंत शेतकरी आत्महत्यांचा आवाज जावा, यासाठी राजू शेट्टी यांनी माळसोन्ना ते परभणी अशी आक्रोश पदयात्रा काढली होती. या पदयात्रेचा समारोप आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाला. त्यानंतर राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सरकारवर टीका केली.
सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्ज वाढतेय, पण उत्पन्न कमी होत आहे, असे सांगतानाच, आता मरायचे नाही तर औकात नव्हती तर कर्जमुक्तीचे आश्वासन का दिले? याचा सरकारला आणि महायुतीच्या नेत्यांना जाब विचारा, असे राजू शेट्टी म्हणाले.