रत्नागिरी जिल्ह्यात 23 मे पर्यंत ऑरेंज अलर्ट, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात 21 मे 23 मे 2025 या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. 21 व 22 मे 2025 या कालावधीत जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह व वादळीवाऱ्यासह (ताशी 50 ते 60 किमी प्रती तास) मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. 23 मे व 24 मे रोजी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in// या संकेतस्थळावरून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (02352) 222233 / 226248 किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर संपर्क करा. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्‍याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.

वीज चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी. वीज चमकत असताना विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा. वीज चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. वीज चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. वीज चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी ॲप’ डाऊनलोड करून घ्यावे. पाऊस पडत असताना वीज चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

जिल्हा आपती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी 02352- 226248 /222233. व्हॉटसअप क्रमांक 7057222233, जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष 02352-222222. पोलीस टोल फ्री हेल्पलाईन 112. जिल्हा रुग्णालय 02352-222363. महावितरण, रत्नागिरी नियंत्रण कक्ष 7875765018. तहसिल कार्यालय रत्नागिरी 02352-223127, तहसिल कार्यालय लांजा 02351-230024, तहसिल कार्यालय राजापूर 02353-222027, तहसिल कार्यालय संगमेश्वर 02354-260024, तहसिल कार्यालय चिपळूण 02355-252044/9673252044, तहसिल कार्यालय खेड 02356- 263031, तहसिल कार्यालय दापोली 02358-282036, तहसिल कार्यालय गुहागर 02359- 240237, तहसिल कार्यालय मंडणगड 02350-225236.

सलग दुसऱ्या दिवशी पावसाने रत्नागिरीला झोडले

सलग दुसऱ्या दिवशी पावसाने रत्नागिरीला झोडपून काढले. अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून पावसाळ्या पुर्वीच्या सर्व कामांचे तीनतेरा वाजले आहेत. आज संध्याकाळनंतर ढगाळ वातावरणासह पावसाने जोरदार हजेरी लावली. रत्नागिरीकर आजपासूनच पावसाळा सुरु झाल्याप्रमाणे रेनकोट आणि छत्र्या घेऊन फिरु लागले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 44.17 मिमी पाऊस पडला आहे. मंगळवारपासून रत्नागिरीत वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. सगळीकडे मान्सूनप्रमाणे पावसाळी वातावरण झाले. या अवकाळी पावसामुळे आगोटची कामे रखडली. सध्या शेतकरी भाजावळ करण्यात व्यस्त होता. मात्र पावसाने शेतकऱ्याचे वेळापत्रक बिघडवले आहे. गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु होती, त्याठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. याचा फटका वाहनचालकांना बसला. रत्नागिरीमध्ये गेल्या 24 तासात 397 मिमी पाऊस पडला, त्यामध्ये मंडणगड 29 मिमी, खेड 43.42 मिमी, दापोली 34.85 मिमी, चिपळूण 33.88 मिमी, गुहागर 38.20 मिमी, संगमेश्वर 60.75 मिमी, रत्नागिरी 74 मिमी, लांजा 38 मिमी, राजापूर 44.62 मिमी पाऊस पडला.