
प्राथमिक शाळेत हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या शासनाच्या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध होत असताना कोकण मराठी साहित्य परिषदेने हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध करत हिंदी भाषा सक्ती का नको? याची कारणे दिली आहेत. बालवयात मुलांच्या मानसिकता लक्षात न घेता हिंदी भाषेची सक्ती करणे अन्यायकारक असल्याचे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी म्हटले आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दृष्टीने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारिरीक आणि बौद्धीक क्षमतेचा विचार करता पहिलीपासून हिंदी या तिसऱ्या भाषेचा आग्रह करणे अन्यायकारक वाटते. बालवयातील मुलांची मानसिकता लक्षात घेता, राज्यातील अनेक नामवंतांनी, शिक्षणतज्ञांनी जाहीरपणे इतक्या लहान वयात तिसऱ्या भाषेचे अध्ययन हे वर्तमान पिढीला झेपणारे नाही, हे स्पष्टपणे सांगितले आहे. सरकारने घेतलेल्या भाषा सक्तीच्या या निर्णयाला एकांगी मानून कोकण मराठी साहित्य परिषदेने विरोध दर्शविला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर व कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे हिंदी भाषेला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे.
प्राथमिक शाळेत हिंदी भाषा सक्तीची करण्याचा शासनाच्या निर्णयाचा विरोध केला जात आहे. अनेक मराठी साहित्यिकांसोबत कोकणात गेली 25 वर्षांहून अधिक काळ साहित्यिक चळवळ राबवणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेनेही हिंदी भाषा सक्तीला विरोध केला आहे.