हा तुमचा कुठला कारभार? चार वर्ष वीज जोडणी मिळत नाही; शिवसेना उपनेते बाळ मानेंनी महावितरणला धरले धारेवर

रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामांना वीजजोडणी मिळते. मात्र एका माणसाला त्याच्या घरासाठी चार वर्षे वीज जोडणी मिळत नाही हा तुमचा काय कारभार आहे. तो माणूस नाही का? वीज मिळणे हा त्याचा हक्क नाही का? असा खणखणीत सवाल विचारत आम्ही संयम राखला हा आमचा दुबळेपणा समजू नका, नाहीतर आमचा संयम सुटला तर तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी दिला. रत्नागिरी जिल्ह्यातील विजेच्या समस्यांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन करत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

रत्नागिरी जिल्ह्यात वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. पाऊस सुरू झाला की वीज गायब असे प्रकार वारंवार घडत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील खरवते उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. तसेच त्याठिकाणी वायरमनही उपलब्ध नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वायरमन नसल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेक ठिकाणी गंजलेले वीजेचे खांब बदलेले नाहीत. उच्च विद्युतभारीत वीजवाहिनीवरील झाडांच्या फांद्याची साफसफाई करण्यात आली नाही. भूमिगत वीजवाहिनीचे काम अपूर्ण असल्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. स्मार्ट मीटरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोध केलेला असतानाही रत्नागिरी जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे ते तात्काळ बंद करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जिल्ह्यातील विजेच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, विभागप्रमुख मयुरेश पाटील, किरण तोडणकर, महिला आघाडी विधानसभा संघटक सायली पवार, माजी नगरसेवक नितीन तळेकर उपस्थित होते.

रत्नागिरी- भोके बस सुरू करा

रत्नागिरी बसस्थानकातून दररोज सकाळी साडे आठ वाजता सुटणारी रत्नागिरी-भोके बस गेली दीड वर्ष बंद करण्यात आली आहे. बस बंद झाल्याने अनेक विद्यार्थी, महिला, नोकरदार वर्गाची गैरसोय झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी- भोके ही सकाळी साडे आठ वाजता सुटणारी बस सुरू करा, तसेच भोके-रेवाळेवाडी बससेवा सुरू करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली.