सामना अग्रलेख – नालायकांचे सच बोलो!

शिवसेना सूडाच्या कारवायांमुळे मागे हटणार नाही. नालायक सरकारला खड्ड्यात गाडून त्यावर भगवा झेंडा फडकवूनच ती पुढे जाईल. मुंबईचे माजी महापौर व शिवसेनेचे उपनेते दत्ता दळवी यांना बुधवारी सकाळी पोलिसांनी घरात घुसून अटक केली. ‘मिंध्यांनी स्व. आनंद दिघे यांच्यावर ‘धर्मवीर’ नामक चित्रपट काढला होता. त्या चित्रपटात दिघे हे नालायक गद्दारांना जी ‘इरसाल’ भाषा वापरतात त्याच उपाधीचा उल्लेख दळवींनी गद्दार हृदयसम्राटांच्या बाबतीत केला. त्याबद्दल पोलिसांनी त्यांना अटक केली. मग त्याच ‘भोसऑऑऑ’ या उपाधीचा वापर केल्याबद्दल ‘धर्मवीर’ चित्रपटाचे निर्माते, दिघे यांची भूमिका करणारे नटवर्य, त्या चित्रपटाचे आर्थिक आश्रयदाते यांच्यावरही गुन्हे दाखल करून पोलीस त्यांना अटक करतील काय?

तुका म्हणे ऐशा नरा।
मोजुनी माराव्या पैजारा।।
– संत तुकाराम

तुकारामांनी हे जे सांगितले ते समाजातील नालायक किंवा भुरटय़ा लोकांविषयी सांगितले, पण तुकाराम महाराज आज असते तर महाराष्ट्रातील ‘मिंधे’ सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी देहू पोलीस स्टेशनच्या कोठडीत केली असती; कारण सत्य आणि परखड बोलणे हा आता दंडनीय अपराध झाला आहे. चोरांना चोर म्हणायचे नाही, गद्दारांना गद्दार म्हणायचे नाही. त्यांना युगपुरुष, महात्मा, धर्मात्मा म्हणा, असे राज्यातील मिंधे सरकारचे फर्मान आहे. यातील काही जणांची स्वतःला हिंदुहृदयसम्राट म्हणवून घेण्यापर्यंत मजल गेली आहे. राज्य एक प्रकारे सामाजिक, सांस्कृतिक बाबतीत अधोगतीस जात आहे. राज्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकऱ्यांच्या जीवनात दुःखच दुःख आले. उभी पिके चिखलात आडवी झाली. प्रचंड नुकसान झालेय. शेतकरी बांधावर बसून धाय मोकलून रडत असताना राज्याचे ‘मिंधे’ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेशात निवडणूक प्रचारासाठी गेले. या नालायकीस काय म्हणायचे? स्वतःचे घर असे वाऱ्यावर सोडून इतर राज्यांतील भाजपाईंना खोके पोहोचविण्यात धन्यता मानणाऱयांना ‘नालायक’ नाही म्हणायचे तर काय म्हणायचे? सरकारच्या नालायकीवर हल्ला केल्याबद्दल ‘गद्दार’ हृदयसम्राटांचे लोक उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी विनम्रपणे करतात. असे हे कलियुगातील खेळ चालले आहेत. महर्षी वाल्मीकींनी सांगितले आहे की, ‘नालायक व नीच लोकांची नम्रता अत्यंत क्लेशदायक, तितकीच घातक असते. धनुष्य, विषारी साप आणि मांजर खाली झुकून वार करतात, तेव्हा अशा ‘विनम्र’ घातक्यांपासून सावधान!’ राज्यातील सत्तेत असलेल्या नालायकांचे सध्याचे विनम्र भाव असेच धोकादायक आहेत.

सत्याचा मुखवटा लावून

ते खोटे बोलत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱयावर सोडून तेलंगणा प्रचारास गेले. तेथे ते म्हणतात, ‘‘आम्हाला घरात बसणाऱयांनी शिकवू नये.’’ पण लाखो शेतकऱ्यांचा आक्रोश पायदळी तुडवून परराज्यांत प्रचारास जाणाऱ्यांनीदेखील आम्हास शिकवू नये. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या तेलंगणा राज्याला मुक्त करायचे असेल तर भाजप हाच पर्याय निवडा, असे महाराष्ट्राचे ‘मिंधे’ मुख्यमंत्री तेलंगणात जाऊन सांगतात, तेव्हा त्यांना कर्जाच्या ओझ्याखाली भुईसपाट झालेला महाराष्ट्रातला ‘मऱ्हाठी’ शेतकरी दिसत नाही. हाच नालायक कारभाराचा नमुना आहे. होय, सरकार व ते चालवणारे खोकेबाज एकजात नालायक आहेत. मुंबईचे माजी महापौर व शिवसेनेचे उपनेते दत्ता दळवी यांना बुधवारी सकाळी पोलिसांनी घरात घुसून अटक केली. ‘श्री. आनंद दिघे यांनी गद्दारी करणाऱया ठाण्यातील मिंध्यांना चाबकाने फोडून काढले असते,’ असे दत्ता दळवी एका मेळाव्यात म्हणाले. ‘मिंध्यांनी स्व. आनंद दिघे यांच्यावर ‘धर्मवीर’ नामक चित्रपट काढला होता. त्या चित्रपटात दिघे हे नालायक गद्दारांना जी ‘इरसाल’ भाषा वापरतात त्याच उपाधीचा उल्लेख दळवींनी गद्दार हृदयसम्राटांच्या बाबतीत केला. स्वतःला हिंदुहृदयसम्राट म्हणवून घेण्याची यांची लायकी आहे काय?’ हा दळवींचा सवाल आहे व त्याबद्दल पोलिसांनी त्यांना अटक केली. मग त्याच ‘भोसऑऑऑ’ या उपाधीचा वापर केल्याबद्दल ‘धर्मवीर’ चित्रपटाचे निर्माते, दिघे यांची भूमिका करणारे नटवर्य, त्या चित्रपटाचे आर्थिक आश्रयदाते यांच्यावरही गुन्हे दाखल करून पोलीस त्यांना अटक करतील काय? ‘धर्मवीर’ चित्रपटातील ‘भोसऑऑऑ’ हा शब्द

‘सेन्सॉर’ने

कापला नाही. म्हणजे तो शब्द योग्यच व उपयुक्त आहे. मग त्याच शब्दासाठी दत्ता दळवींना अटक करणे हा जुलूम आहे. अर्थात शिवसेना अशा सूडाच्या कारवायांमुळे मागे हटणार नाही. नालायक सरकारला खड्ड्यात गाडून त्यावर भगवा झेंडा फडकवूनच ती पुढे जाईल. अब्दुल सत्तार या मंत्र्याने सुप्रिया सुळे यांच्याबाबत अत्यंत नीच पातळीची भाषा वापरूनही त्या सत्तारांवर गुन्हा नाही. गुंड-खुन्यांचे फोटो गद्दार हृदयसम्राटांच्या चिरंजिवांसोबत जाहीरपणे झळकतात, त्यावर कारवाई नाही. मिरवणुकांत गोळीबार करणाऱ्यांना अभय देऊन त्यांना पुन्हा सिद्धिविनायक चरणी ‘विश्वस्त’ मंडळाचे अध्यक्ष केले जाते. मागठाण्याच्या आमदाराच्या दिवटय़ा चिरंजीवाने हाती पिस्तूल घेऊन एका बिल्डरास किडनॅप करूनही तो मोकळा आहे. असे हे महाराष्ट्रात बेकायदेशीर सरकारचे नालायक राज्य आहे. कोणी एक बागेश्वरबाबा, संत तुकाराम, साईबाबांपासून श्रीरामांपर्यंत सगळ्यांची यथेच्छ बदनामी करतो, त्या ‘बाबा’वर गुन्हा नोंदविण्याचे सोडा, पण येथील नालायक सरकार व भाजप त्याच्या चरणी लीन होते. हे आश्चर्यच नाही काय? राहत इंदौरी यांचा एक प्रसिद्ध शेर आहे-

‘‘झूठों ने झूठों से कहा है
सच बोलो।।
सरकारी ऐलान हुआ है
सच बोलो।।
घर के अंदर तो
झूठों की एक मंडी है,
दरवाजे पर लिखा हुआ है
सच बोलो।।

महाराष्ट्राची नेमकी हीच स्थिती आहे.