सामना अग्रलेख – नागपूर कोणी बुडवले?

केवळ चार तासांच्या पावसात नागपूर बुडाले. त्यात तुमच्या विकासाच्या थापा गटांगळय़ा खाताना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्या. या महापुराने नागपूरच्या स्वयंघोषित ठेकेदारांचा मुखवटाही गळून पडला. आता तरी ते आणि त्यांचा ‘परिवार’ काही ‘चिंतन’ करणार आहेत का? मुंबई तुंबली म्हणून शिवसेनेकडे बोट दाखविणाऱ्यांचे आता नागपूरचे ‘तुंबापूर’ झाले यावर काय म्हणणे आहे? नागपूर कोणी बुडवले? असा प्रश्न नागपूरकर विचारत आहेत. त्याचे आधी उत्तर द्या आणि मगच नागपूरच्या विकासाच्या वल्गना करा.

राज्याची उपराजधानी नागपूरच्या विकासाच्या वल्गना शनिवारी चार तासांच्या मुसळधार पावसात वाहून गेल्या. शुक्रवार मध्यरात्र ते शनिवार सकाळपर्यंत पडलेल्या पावसाने नागपुरात हाहाकार माजविला. नाग नदीला आलेल्या महापुराने पाच जणांचे बळी घेतले. दहा हजारांपेक्षा जास्त बैठी घरे, बंगले, झोपड्या, दुकाने यांचे भयंकर नुकसान झाले. अनेक गाड्या वाहून गेल्या. कमी काळात प्रचंड पाऊस हे या हाहाकाराचे कारण सांगितले जात आहे. त्यात तथ्य असले तरी नागपूरच्या विकासाच्या गप्पा शेवटी ‘गोलगप्पा’च ठरल्या या वस्तुस्थितीचे काय? नागपूरच्या विकासाचा ठेका आणि मक्ता ज्या स्वयंघोषित ठेकेदारांकडे वर्षानुवर्षे आहे, त्यांच्याकडे या प्रश्नाचे काय उत्तर आहे? ते नसल्यानेच मग आक्रोश करणाऱ्या पूरग्रस्तांना हाताने धरून बाजूला करण्याची वेळ आज तुमच्यावर आली. एखाद्या पूरग्रस्ताचे तोंड तुम्ही तात्पुरते बंद करू शकाल, पण या महापुराने तुमचे तोंड पुरते बंद केले आहे हे लक्षात घ्या. मागील काही वर्षांत नागपूर शहराने कशी चहूबाजूंनी प्रगती केली आहे, विकासकामांनी कशी भरारी घेतली आहे याचे ढोल पिटले जात आहेत. सिमेंटचे रस्ते, फ्लायओव्हर्स, मेट्रो रेल्वे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेला मेट्रो आणि फ्लायओव्हर यांचा संगम असलेला ‘डबल डेकर व्हायाडक्ट’ अशी अनेक उदाहरणे देत तेथील

विकासाचा दाखला

दिला जातो. मात्र हा डंका किती पोकळ आहे, हा विकास कसा तकलादू आहे, हे शनिवारी पहाटे पडलेल्या चार तासांच्या पावसाने उघड केले. राज्याच्या दोन ‘उपप्रमुखां’पैकी सीनियर देवेंद्र फडणवीस स्वतःला नागपूरचे सुपुत्र समजतात. मात्र नागपूर महापुराच्या पाण्यात गटांगळय़ा खात असताना, त्यात सापडलेले पूरग्रस्त मदतीसाठी टाहो फोडत असताना हे सुपुत्र मुंबईत केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबर गणेश दर्शन घेत होते, बंद खोलीत चर्चा करीत होते. पावसाने, महापुराने व्हायचे ते नुकसान झाल्यावर ते त्यांच्या होम टाऊनमध्ये गेले. पूरग्रस्त भागाचा दौरा, पाहणी, पूरग्रस्तांच्या गाठीभेटी, नुकसानभरपाईचे आश्वासन हे नेहमीचे सोपस्कार पार पाडले. पूरग्रस्तांसाठी हे सगळे तर होणारच, परंतु सरकार म्हणून आणि नागपूरचे स्वयंघोषित विश्वस्त म्हणून तुम्ही आतापर्यंत जे दिवे लावलेत ते या महापुराने विझवले, त्याचे काय? वास्तविक नागपूरला अशा महापूर आणि हाहाकाराचा इतिहास नाही. तथापि मागील 30 वर्षांत किमान चारवेळेस अशी आपत्ती या शहरावर कोसळली आहे. शनिवारी त्याची पुनरावृत्ती भयंकर प्रमाणात झाली. मात्र शहर विकासाचा आराखडा आखताना निसर्गाच्या या धोकादायक बदलांचा कुठलाही विचार केला गेला नाही हेच शनिवारी रात्री आलेल्या महापुराने दाखवून दिले. जेमतेम चार-साडेचार इंच पावसाने नागपूरच्या विकास धोरणाची

अब्रूच वेशीवर

टांगली. एरवी मुसळधार पावसाने मुंबईत पाणी साचले की, शिवसेनेकडे बोट दाखविणारे तुम्हीच आहात ना? मग आता ज्या नाग नदीतून बोटी चालविण्याचे स्वप्न तुम्ही दाखविले त्याच नाग नदीत हजारो कुटुंबांची घरेदारे, संसार, गाडय़ा वाहून जाताना पाहण्याची वेळ नागपूरकरांवर का आली? त्यासाठी कोणाकडे बोट दाखवायचे? याच नाग नदीच्या महापुरात तुमच्या तथाकथित विकासाचा आज चिखल झाला आहे आणि त्या चिखलात सामान्य नागपूरकर आपले किडुकमिडुक शोधत वणवण फिरत आहेत. त्याचे काय प्रायश्चित्त तुम्ही घेणार आहात? मुंबईला जशी भौगोलिक मर्यादा आणि सागरी निर्बंध आहेत, दाटीवाटीची लोकवस्ती आहे तसे नागपूरबाबत नाही. तरीही तुमचे तेथील विकासाचे मॉडेल शनिवारच्या महापुरात वाहून गेले. केवळ चार तासांच्या पावसात नागपूर बुडाले. त्यात तुमच्या विकासाच्या थापा गटांगळय़ा खाताना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. या महापुराने नागपूरच्या स्वयंघोषित ठेकेदारांचा मुखवटाही गळून पडला. आता तरी ते आणि त्यांचा ‘परिवार’ काही ‘चिंतन’ करणार आहेत का? मुंबई तुंबली म्हणून शिवसेनेकडे बोट दाखविणाऱ्यांचे आता नागपूरचे ‘तुंबापूर’ झाले यावर काय म्हणणे आहे? नागपूर कोणी बुडवले? असा प्रश्न नागपूरकर विचारत आहेत. त्याचे आधी उत्तर द्या आणि मगच नागपूरच्या विकासाच्या वल्गना करा.