सामना अग्रलेख – मोदी बरे होवोत!

मोदी हा भारतीय राजकारणातील पोकळ खांब आहे हे सगळ्यांनाच कळून चुकले आहे. पराभवाच्या भीतीने त्यांचे हातपाय मारणे सुरू आहे. मोदी म्हणतात, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी आमच्या सोबत यावे, त्यांची स्वप्ने पूर्ण होतील. मोदी यांचे हे विधान भंपक आहे. मोदींच्या हुकूमशाही व भ्रष्टाचारास संरक्षण देण्याच्या कृतीविरुद्ध शरद पवार व उद्धव ठाकरे हे दोन नेते उभे ठाकले आहेत. मोदी यांची हुकूमशाही नष्ट करणे हेच या दोघांचे स्वप्न आहे. देशाच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्या मोदी यांच्या सोबत महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष कधीच जाणार नाहीत. मोदी यांनी हे असेच बेताल बोलत राहावे. महाराष्ट्रासाठी ते चांगले आहे. तरीही मोदी यांच्या प्रकृतीस आराम पडो, अशी आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करीत आहोत.

नरेंद्र मोदी हे नितीश कुमार यांच्याप्रमाणेच आजारी असून भारतीय जनता पक्षाने त्यांना फार दगदग करू देऊ नये. देशासाठी नसले तरी भाजपसाठी मोदी महत्त्वाचे आहेत. दुसरे असे की, काँग्रेस पक्षात मणिशंकर अय्यर, सॅम पित्रोदा वगैरे लोक जे बोलतात त्याचा फायदा भाजपास होतो. आजारपणामुळे मोदी त्याच रांगेत जाऊन बसले. मोदी यांची भाषणे व वक्तव्ये यामुळे भाजपचीच कोंडी होताना दिसत आहे. मोदी यांची प्रकृती बरी नसल्याचे हे लक्षण आहे. मोदी हे नंदुरबार येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आले. तेथे त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी आमच्या बरोबर यावे हे त्यांचे विधान हास्यास्पद आहे. गेल्या काही दिवसांपासून मोदी महाराष्ट्रात ठाण मांडून बसले आहेत. त्यांना महाराष्ट्राची भीती वाटते. महाराष्ट्रात आपल्याविरुद्ध वातावरण आहे हे त्यांनी जाणले आहे. मोदी यांनी प्रत्येक भाषणात ‘ठाकरे-पवार’ यांच्यावर जहरी टीका केली. हे दोन्ही नेते व त्यांचे पक्ष नकली आहेत, उद्धव ठाकरे हे तर नकली संतान असल्याची गरळ त्यांनी ओकली. मग हे नकली लोक मोदींना त्यांच्या सोबत 4 जूननंतर का हवे आहेत? हा भाजपच्याच मंडळींना पडलेला प्रश्न आहे. ‘‘एक अकेला सब पर भारी’’ असे मोदी स्वतःच स्वतःविषयी सांगतात. एकट्याच्या बळावर आपण लोकसभेच्या चारशेपार जागा जिंकू अशा वल्गना मोदी यांनी आधीच केल्या आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासारखे पोकळ बांबू त्यांनी ‘टेकू’ म्हणून भाजपला लावले. शिंदे, अजित पवार वगैरे लोक हे महाबली असल्याचे त्यांनी जाहीर केले. मग तरीदेखील उद्धव ठाकरे, शरद पवार त्यांना का हवे आहेत? याचे उत्तर एका वाक्यात सांगायचे तर मोदी हे लोकसभा निवडणुकीत पराभूत होत आहेत. त्यांना बहुमत मिळणार नाही. त्यामुळे

बहुमताचा आकडा गाठण्यासाठी

उद्धव ठाकरे, शरद पवार यांची मदत त्यांना लागणार. त्यामुळे आतापासून मोदी यांनी लाडीगोडीचे डाव टाकायला सुरुवात केली आहे. माणूस आधी मनाने हरतो व मग रणांगणात हरतो. मोदी हे मनाने पराभूत झाल्याचे स्पष्ट दिसते. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांपैकी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची आघाडी किमान 35 जागा जिंकत आहे व महाराष्ट्राचा मतदार मोदींना धडा शिकवण्याच्या भूमिकेत आहे. ‘मोदी मॅजिक’, ‘मोदींची जादू’, ‘मोदी है तो मुमकीन है’ वगैरे प्रयोग यावेळी कोसळले आहेत. मोदी यांनी महाराष्ट्रात जे उटपटांग डाव टाकले ते त्यांच्यावरच उलटले आहेत. मोदी-शहा जोडीस भयाने ग्रासले आहे व त्यातूनच त्यांना काही नवे विकार जडले असावेत. मोदी हे ताळतंत्र सोडून बोलत आहेत. मोदी यांचे राजकीय आकलन व अनुभव वेगळाच आहे. त्यामुळे शरद पवार यांनी काँग्रेस व इतर पक्षांच्या विलीनीकरणासंदर्भात नक्की काय सांगितले ते मोदी यांच्या डोक्यात धड गेले नाही. लोकसभा निवडणुकीनंतर काही प्रादेशिक पक्ष जे मूळ काँग्रेस विचाराचे आहेत त्यातले काही पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होऊ शकतात, असे श्री. पवार म्हणाले. याचा अर्थ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससारखे मोठे पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होतील असे नाही. शिवसेनेचा तर प्रश्नच निर्माण होत नाही, पण लोकसभेनंतर काँग्रेस मोठा पक्ष म्हणून समोर आला तर देशातील काही लहान पक्ष काँग्रेसच्या वाटेने जातील. आज ‘रालोआ’ म्हणजे भाजपबरोबर असलेल्या छत्र्यांचाही त्यात समावेश असू शकेल. अनेकांना मोदी यांच्या हुकूमशाहीचे जोखड फेकून द्यायचे आहे व त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्ष मजबूत होणे गरजेचे आहे. मोदी यांनी त्यांच्या पक्षात अनेक

काँग्रेसवाल्यांची भरती

केली. 4 जूननंतर यातले बरेच लोक मूळ काँग्रेस पक्षात परत जातील. ओडिशा, आसाम, जम्मू-कश्मीर, तामीळनाडू राज्यांत प्रादेशिक पक्ष काम करतात. ते मूळ काँग्रेस विचारधारेचे आहेत. महाराष्ट्रात जिल्हा पातळीवर काही पक्ष काम करतात व त्यांचे एखाददुसरे आमदार निवडून येत असतात. असे पक्षही काँग्रेस पक्षात विलीन होण्याची शक्यता आहे हे मोदी यांनी समजून घेतले पाहिजे. अजित पवार व मिंधे गटाबाबत भाजपचा पूर्ण अपेक्षाभंग झाला आहे. उद्या जर भाजपने त्यांना लाथा घातल्या तर मिंधे-अजित पवार गटास काँग्रेसचाच मार्ग स्वीकारावा लागेल. राजकारण हे शेवटी बुडबुडय़ाप्रमाणेच असते. जो तो वैयक्तिक स्वार्थ व अस्तित्वासाठीच लढत असतो. भाजपचे धोरण असे की, प्रादेशिक पक्षांच्या मदतीने स्वतः वाढायचे व गरज संपताच त्याच प्रादेशिक पक्षांना संपवायचे. गोवा, हरयाणातील असे प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेस पक्षात विलीन होऊ शकतात. अशाने काँग्रेस मजबूत होईल हीच भीती मोदी यांना वाटत असावी. मोदी हा भारतीय राजकारणातील पोकळ खांब आहे हे सगळय़ांनाच कळून चुकले आहे. पराभवाच्या भीतीने त्यांचे हातपाय मारणे सुरू आहे. मोदी म्हणतात, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी आमच्या सोबत यावे, त्यांची स्वप्ने पूर्ण होतील. मोदी यांचे हे विधान भंपक आहे. मोदींच्या हुकूमशाही व भ्रष्टाचारास संरक्षण देण्याच्या कृतीविरुद्ध शरद पवार व उद्धव ठाकरे हे दोन नेते उभे ठाकले आहेत. मोदी यांची हुकूमशाही नष्ट करणे हेच या दोघांचे स्वप्न आहे. देशाच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱया मोदी यांच्या सोबत महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष कधीच जाणार नाहीत. मोदी यांनी हे असेच बेताल बोलत राहावे. महाराष्ट्रासाठी ते चांगले आहे. तरीही मोदी यांच्या प्रकृतीस आराम पडो, अशी आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करीत आहोत.