
अहमदाबाद विमान अपघातानंतर देशावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्या दुःखाची पर्वा न करता पंतप्रधान मोदी सायप्रस वगैरे देशांच्या दौऱ्यावर गेले. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांचीही तीच तऱ्हा म्हणायला हवी. नको त्या कामांसाठी उधळपट्टी करणारे सरकार इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम करत नाही व एका क्षणात तो पूल कोसळून माणसे जिवंत वाहून जातात. त्यावर मुख्यमंत्री शोक व्यक्त करतात व त्यांचे खजिनदार मृतांना पाच लाखांची मदत घोषित करतात. महाराष्ट्रावर निर्दय मनाची माणसे राज्य करीत आहेत, असेच म्हणावे लागेल.
देशात आणि महाराष्ट्रात एकापाठोपाठ एक अशा दुर्घटनांची मालिका सुरू आहे. स्वतःला ‘विकास पुरुष’, ‘जनतेचे तारणहार’ वगैरे म्हणवून घेणाऱ्यांची हवा त्यामुळे निघाली आहे. दुर्घटना घडत आहेत. त्यात माणसांचे बळी जात आहेत हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. महाराष्ट्रावर तर मोठीच आफत आली आहे. मावळ तालुक्यातील कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला. त्यात किमान 35-40 पर्यटक वाहून गेल्याचे वृत्त धक्कादायक आहे. पूल जुना होता. त्याच्यावर पर्यटकांनी गर्दी केली. भार जास्त झाल्याने तो कोसळला. याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त करून हे कसे घडले याबाबत चौकशीचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांचे दुःख, चिंता, चौकशीचे आदेश हे एक ढोंग आहे. मगरीचे अश्रू आहेत. मुख्यमंत्र्यांचे खजिनदार गिरीश महाजन हे अशा दुर्घटनांची जणू वाटच पाहतात. दुर्घटना झाली की, लगेच ते मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना पाचेक लाखांची मदत जाहीर करतात. सरकारी हलगर्जीपणामुळे जे जीव जातात त्या जिवांची किंमत गिरीश महाजन प्रत्येकी पाच लाख ठरवतात, पण जीव का जात आहेत? कोणामुळे जात आहेत? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? इंद्रायणी नदीवरील पूल जुना झाला. तो नव्याने बांधण्यासाठी सरकारने आठ कोटी रुपये मंजूर केले. हे आठ कोटी कागदावरच राहिले. सर्व पैसा राजकीय लाभार्थी योजनांवर खर्च झाल्याने राज्य सरकारच्या
तिजोरीत खडखडाट
आहे. परिणामी, इंद्रायणी नदीवरील पूल दुरुस्त झाला नाही व माणसे वाहून गेली. हा सदोष मनुष्यवधाचाच अपराध आहे. या पूल दुर्घटनेत लोकांचे प्राण घेणाऱ्या सरकारचे मुख्यमंत्री श्रीमान फडणवीस आहेत. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत आणि ज्या मावळात ही भयंकर दुर्घटना घडली तेथील आमदार सुनील शेळके हे अजित पवार यांचे खास हस्तक आहेत. आमदारांना त्यांच्या गावातला जीर्ण पूल दिसला नाही, पण स्वतः निवडून येण्यासाठी त्यांनी शंभरावर कोटी रुपये खर्च केले. अजित पवार पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाकडे लक्ष देतात म्हणजे नक्की काय करतात? बिल्डरांचा, जमीनदारांचा विकास होतो, पण इंद्रायणी नदीवरील जीर्ण पूल कोसळून माणसे वाहून जातात. ही गरीबांची कामे विकासाच्या व्याख्येत बसत नाहीत. महाराष्ट्राला दुर्घटना आणि अपघातांचे तडाखे बसत आहेत. अहमदाबादच्या विमान अपघातात महाराष्ट्रातल्या 17 जणांचा मृत्यू झाला. केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून अकोल्याचे कुटुंब ठार झाले. गोदावरी नदीत पाच युवकांचा बुडून मृत्यू झाला. माथेरानच्या शार्लोट तलावात तीन पर्यटक बुडाले. चारही बाजूंनी फक्त दुःखद,
निराश करणाऱ्या वार्ताच
कानावर येत आहेत. त्याच वेळी मालवणच्या राजकोटवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याखालच्या जमिनीस तडे गेल्याची बातमी चिंताजनक आहे. आधी तेथील पहिला भव्य पुतळा कोसळला व आता नव्या पुतळ्याखालची जमीन खचली. सार्वजनिक बांधकाम खात्याचे हे अपयश आहे. इकडे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आणि तिकडे शिवरायांच्या पुतळ्याखालचे बांधकाम बिघडले. मग यावर खर्च झालेले कोट्यवधी रुपये नक्की गेले कोठे? याची चौकशी करणार नसाल तर तुमच्या तपास आणि चौकशांच्या घोषणा व्यर्थ आहेत. मुंबई लोकलमधून पडून झालेला पाच प्रवाशांचा मृत्यू, त्याचे दुःख आणि धक्का राज्याला अस्वस्थ करीत आहे. रेल्वे, नद्या, रस्ते, हवाई वाहतूक सगळेच या राज्यात असुरक्षित बनले आहे. अहमदाबाद विमान अपघातानंतर देशावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्या दुःखाची पर्वा न करता पंतप्रधान मोदी सायप्रस वगैरे देशांच्या दौऱ्यावर गेले. विमान अपघातातील मृतांच्या चिता विझलेल्या नाहीत. कुटुंबीयांचे अश्रू थांबलेले नाहीत आणि पंतप्रधान अहमदाबादेत आले व निघून गेले. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांचीही तीच तऱहा म्हणायला हवी. नको त्या कामांसाठी उधळपट्टी करणारे सरकार इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम करत नाही व एका क्षणात तो पूल कोसळून माणसे जिवंत वाहून जातात. त्यावर मुख्यमंत्री शोक व्यक्त करतात व त्यांचे खजिनदार मृतांना पाच लाखांची मदत घोषित करतात. महाराष्ट्रावर निर्दय मनाची माणसे राज्य करीत आहेत, असेच म्हणावे लागेल.