
विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, असे विचारत ‘क्या हुआ तेरा वादा?’ या जनआंदोलनांतर्गत शिवसेनेने आज बुधवारी क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा ट्रॅक्टर मोर्चा काढला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे ट्रॅक्टरमध्ये बसून व शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे ट्रॅक्टर चालवत विभागीय आयुक्तालयावर धडकले. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
‘क्या हुआ तेरा वादा?’ या जनआंदोलनांतर्गत शिवसेनेच्या वतीने आज क्रांतीचौक येथून ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात झाली. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर दानवे यांनी ट्रॅक्टरचा ताबा घेत ‘क्या हुआ तेरा वादा’, शेतकर्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, महायुती सरकार हाय-हाय, या युती सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, शेतकर्यांची फसवणूक करणार्या सरकारचा निषेध असो, सोयाबीनला भाव मिळालाच पाहिजे… अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
शिवसेनेच्या या ट्रॅक्टर मोर्चात श्ोतकरी स्वत:हून ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले. एका लाईनमध्ये निघालेला ट्रॅक्टर मोर्चा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. क्रांतीचौक, सिल्लेखाना चौक, पैठणगेट, गुलमंडी, संभाजीपेठ, ज्युबलीपार्क, मिलकॉर्नर, लेबर कॉलनी उड्डाणपूल, आमखास मैदान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक मार्गे हा ट्रॅक्टर मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडकला.
शेतकर्यांचा सातबारा कधी कोरा करणार? – दानवे
कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजना, लाडक्या बहिणींना 2100 रुपये, 45 हजार पाणंद रस्ते, अन्नदाता ऊर्जादाता, शेतकर्यांच्या पिकांना हमीभाव, खतावरील जीएसटी अनुदान परत आणि एक रुपयात पीकविमा अशा ढीगभर वचनांचा ढोल बडवून सत्तेत आलेलं हे सरकार आता सगळं विसरलंय. सत्तेच्या खुर्चीवर बसताच या सरकारने जनतेची फसवणूक केली. म्हणूनच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या या तिहेरी सरकारला आम्ही विचारतो, ‘क्या हुआ तेरा वादा?’ असा खणखणीत सवाल शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी महायुती सरकारला विचारला.
महाराष्ट्रात आंदोलनाची लाट उसळेल : खैरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात शेतकर्यांना अडीच लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती. विधानसभा निवडणुकदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या आश्वासनांचा वादा दिला होता, त्याचा जाब आम्ही विचारत आहोत.. लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये सत्ता आल्यानंतर देणार होते. 2100 तर सोडा, 1500 रुपये महिलांना वेळेवर मिळत नाहीत. क्या हुआ तेरा वादा? या आंदोलनाची लाट आता संपूर्ण महाराष्ट्रात उसळणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.
विभागीय आयुक्तालयासमोर ट्रॅक्टर मोर्चा आल्यानंतर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली मागण्यांचे निवेदन देण्यात आले. किसान सेनेचे जिल्हा संघटक नानासाहेब पळसकर हे गुलाबी फेटा बांधून, धोतर व नेहरु शर्ट परिधान करून सहभागी झाले होते.
‘क्या हुआ तेरा वादा?’ या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासन आणि प्रशासनाचे राज्यातील, विशेषतः मराठवाड्यातील, या गंभीर आणि मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधत आहोत. केवळ पोकळ आश्वासने आणि घोषणाबाजी करण्याऐवजी, सरकारने तात्काळ या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि राज्यातील जनतेला न्याय द्यावा. अन्यथा, जनतेच्या असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशाराही दानवे यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, किसान सेना नेते नानासाहेब पळसकर, भारतीय कामगार सेनेचे नेते प्रभाकर मते पाटील, उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे, अरविंद धिवर, राजू इंगळे, संतोष खेंडके, विजय वाघमारे, संतोष जेजुरकर, चंद्रकांत गवई, बाबासाहेब डांगे, तालुकाप्रमुख शंकर ठोंबरे, आनंद भालेकर, उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, विधानसभा संघटक वीरभद्र गादगे, अनिल चोरडिया, शहर संघटक सचिन तायडे, माजी नगरसेवक सीताराम सुरे, बन्सी जाधव, कमलाकर जगताप, प्रल्हाद निमगावकर, उपशहरप्रमुख संजय कोरडे, प्रीतेश जैस्वाल, राजेंद्र दानवे, सचिन वाघ, संजय पवार, बापू पवार, संदेश कवडे, सुगंधकुमार गडवे, गणेश नवले, उपशहरप्रमुख अजय चोपडे, अनिल लहाने, प्रमोद ठेंगडे, गणेश लोखंडे, संजय हरणे, नितीन पवार, सुरेश गायके, दिनेशराजे भोसले, किसान सेना तालुकाप्रमुख मदन चौधरी, बाबासाहेब भोसले, बबनराव वाघ, आबासाहेब भोसले, रवी कसारे, सुभाष लहाने, ज्ञानेश्वर गिरी, विशाल चौधरी, दत्ता चौधरी, दत्ता उकिर्डे, सोपान ठोंबरे, विशाल चौधरी, एकनाथ चौधरी, अनिल भालेराव, रफिक पठाण, दीपक कणसे, रामेश्वर कुबेर, राजू म्हस्के, अशाेक लोखंडे, बळीराम बुरकुल, बाबासाहेब भालेकर, विकास जाधव, गणेश नवले, कपिंद्र पेरे, महेंद्र खोतकर, अतुल दाभाडे, दत्तात्रय वर्पे, विनोद दाभाडे, अंकुश कान्हेरे, सतीश बुधवंत, राकेश सक्सेना, सत्यनारायण दरगड, यशवंत चौधरी, मनीष गाजरे, नंदकिशोर मुळे, अंकुश कान्हेरे, दीपक कान्हेरे, लक्ष्मण कान्हेरे, विजय वाडेकर, युवासेना सहसचिव अॅड. धर्मराज दानवे व आकाश लेंभे आदी उपस्थित होते.