सरकारने लवकर कर्जमुक्ती केली नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारचा चक्काजाम करणार; उद्धव ठाकरे यांचा इशारा

मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. ‘दगाबाज रे..’ या संवाद दौऱ्यात त्यांनी बुधवार बीडमधील पाली येथील संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. सरकार तुमच्या पाठिशी आहे, असे सरकारने सांगितले. मात्र, सरकार आम्हाला धीर देण्यासाठी आमच्या पाठिशी नसून आमच्या पाठित खंजीर खुपण्यासाठी आहे, अशी व्यथाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तसेच सरकारने कर्जमुक्तीसाठी दिलेली जूनची तारीख आम्हाला मान्य नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

आपण सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून पुढील चार दिवस आपण अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत. यात काहीही राजकारण नाही, काहींना सर्वठिकाणी राजकारणच दिसते. आपण खरे काय आणि खोटे काय ते बघण्यासाठी आलो आहोत. कधी नव्हे एवढी मोठी आपत्ती मराठवाड्यावर कोसळली आहे. मे महिन्यापासूनच येथे पावासाने थैमान घातले होते. राज्यात सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला होता. आपला दसरा मेळावाही पावसातच झाला. हेस संकट थांबणार कधी, याचा थांगपत्ता लागत नाही. कधी उघडीप दिसली की संध्याकाळी ढग दाटून येतात आणि पावसाला सुरुवात होते, असे ते म्हणाले.

हे अस्मानी संकट असतानाच शेतकऱ्यांना सुल्तानी संकटाचाही सामना करावा लागतोय. बीड हा दुष्काळी जिल्हा आहे. याआधी बीडमध्ये आपण देता की जाता, अशी सभा शेतकऱ्यांसाठी घेतली होती. त्यावेळी शरद पवार केंद्रात कृषिमंत्री होते. देशातील कोणत्याही शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली नव्हती, मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी एकवटून कर्जमाफी मागितली. त्यामुळे देशातील सर्व शेतकऱ्यांना मनमोहन सिंग पंतप्रधान असतना कर्जमाफी मिळाली. त्यानंतर आपले सरकार असताना आपण कर्जमाफी केली होती. मात्र, आता मुख्यमंत्री पंचाग काढून बसले आहेत. आता त्यांनी पुढच्या वर्षीच्या जूनचा मूहूर्त काढला आहे. त्यांच्या खुर्चीवर अनेक ग्रहांची व्रकदृष्टी आहे, त्याला आपण काही करू शकत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.

कर्जमाफीचा मुहूर्त जुनचा असल्यामुळे आता शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते फेडायचे की नाही, कर्जमाफी मिळणार असल्याने ते हप्ते का फेडायचे, नाही फेडले तर खरीपासाठी कर्ज मिळणार आहे का, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. येथील अतिवृष्टीत स्रव पीके उद्ध्वस्त झाली. गेल्या काही दिवसापासून कर्जमाफीची मागणी जोर धरत होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ढोपराला गूळ लावून सोडून दिले. जूनमध्ये कर्जमाफी देणार असल्याचे सांगत ते निवडणुका काढून घेणार आहे. त्यामुळे आता आधी कर्जमुक्ती करा, त्यानंतर आम्ही मत देऊ, असे सरकारला ठणकावून सांगा. निवडणुकीआधी फडणवीस, अजित पवार कर्जमाफीचे आश्वासन देत होते. आता त्याचे काय झाले, असा सवालही त्यांनी केला.

मतांसाठी त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यातही त्यांनी घोटाळा केला आहे. आता त्यात अनेक निकष लावत अनेक नावे वगळली आहे. अनेक पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे हे दगाबाज सरकार आहे. आता कर्जमुक्ती केली तर बँकांचा फायदा होईल, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. मात्र, बँकांना फायदा न मिळता जूनमध्ये ते कर्जमाफी कशी करणार आहेत, असा सवालही त्यांनी केला. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये कर्जमुक्ती मिळायलाच हवी, ही आमची मागणी आहे. शेतकऱ्यांची जमीनच वाहून गेली आहे. आधी त्यांना जमीन तयार करायला शेतकऱ्यांनी पैसे द्या. आम्ही कर्जमाफीसाठी संघर्ष करतोय. जनतेला फसवून हे सरकार सत्तेत आले आहेत. मतदारांची दुबार, तिबार नोंदवून हे सत्तेवर आले आहे. हे वोटचोरी आणि दगाबाजी करून सत्तेत सरकार आले आहे. त्यांना आता जाब विचारावाच लागेल, असे ते म्हणाले.

आमची सत्ता नसूनही आमचे नेते, पदाधिकारी जनतेची मदत करत आहेत. आमले सरकार आले असते तर शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली नसती. आता या दगाबाज सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आम्हाला कर्जमुक्तीसाठी जूनची तारीख मान्य नाही. निवडणूक आली की एखादी योजना जाहीर करतात. त्याला जनता बळी पडते, नंतर त्यांच्यावर रडण्याची वेळ येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊ नये. सरकारला जाब विचारा, कोणाचेही कितीही पाशवी बहुमत असलेले सरकार असले तरी त्यांना गुडघ्यावर आणण्याची ताकद जनतेत आहे. आता जनता जागी झाली आहे. कर्जमुक्तीसाठी आपण एक मोर्चा काढला आहे. आता सरकारने लवकर कर्जमुक्ती केली नाही तर फक्त मराठवाडाच नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारचा चक्काजाम केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.