
>> डॉ. समिरा गुजर जोशी
रामायणासारख्या श्रेष्ठ ग्रंथात जेव्हा कथेच्या ओघात काही वेगळाच प्रसंग येतो तेव्हा मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात. आपल्याला फारसा महत्त्वाचा न वाटणारा प्रसंग स्वत महर्षि वाल्मीकी वर्णन करत आहेत त्याअर्थी तो मुख्य कथानकाला पुढे नेण्यासाठी फार पोषक नसला तरी त्यातून काहीतरी सांगायचे असणार. त्याशिवाय त्या प्रसंगाची योजना ते करणार नाहीत. असाच एक प्रसंग सुंदर कांडामध्ये येतो. तो आहे मधुवनाचा प्रसंग. अंगद आणि हनुमंत सेनेसह सीतेचा शोध घेण्यासाठी गेले आहेत. हनुमंताने कार्य पूर्ण केलेले आहे. जरी सीतेचा प्रत्यक्ष शोध एकटय़ा हनुमंताने घेतलेला असला तरी वानर सेनेने गेले कित्येक दिवस त्यासाठी कष्ट घेतले आहेत. अतिशय अवघड अशी कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे आणि त्यात त्यांना यश मिळाले आहे. ही आनंद वार्ता सांगण्यासाठी आता ते प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सुग्रीवाकडे निघाले आहेत. पण वाटेत त्यांना मधुवन लागते. हे सुग्रीवाचे राजउद्यान आहे. ते फळाफुलांनी डवरलेले आहे. ते नंदनवनाइतके सुंदर आहे असे म्हटले आहे. तिथे दधिमुख नावाच्या सुग्रीवाच्या अधिकाऱयाचा पहारा आहे.
वानरांची इच्छा आहे की मोहीम फत्ते झाली आहे तर आपण हा आनंद ह्या वनात मधुप्राशन करून साजरा करावा. रामायणात मधु हाच शब्द आहे. एकनाथांनी भावार्थ रामायणात मद्य असाही पर्याय वापरला आहे. वानर सैन्य शिस्तीचे आहे. त्यांना मधुवनातील मधाचा आस्वाद घ्यायची इच्छा झाली तरी ते परवानगीशिवाय काही करत नाहीत. त्यांनी परवानगी विचारल्यावर अंगदही तिथे उपस्थित जांबुवतासारख्या ज्येष्ठांची अनुमती घेऊन त्यांना मधुवनात शिरण्याची परवानगी देतो. मग काय? एरवी शिस्तबद्ध वागणारी मुले सहलीला गेल्यावर जशी स्वच्छंद फिरतात, तसेच वानर सेनेचेही वागणे आहे. कोणी झाडावर चढले आहे, कोणी उडय़ा मारीत आहे. हळूहळू मधाची धुंदी त्यांना चढू लागली आहे आणि तसेही मजामस्ती करताना भान हरपते. सगळ्यांच्या अंगात काहीतरी संचारल्यासारखे होते. मग ती कुणाला जुमानत नाहीत. या वानरांना आवरण्याचा प्रयत्न दधिमुख करतो आहे. पण वानरांनी त्यालाच बोचकारले आहे. अर्थात हे तसे सारे मजेत सुरू असले पाहिजे. कारण वानरांना प्रोत्साहन द्यायला तिथे साक्षात हनुमंत उभे आहेत. अंगद ही त्यांची मजा पाहतो आहे.
शेवटी इथे कोणी आपलं ऐकण्याचा मनःस्थितीत नाही हे लक्षात आल्यावर दधिमुख थेट सुग्रीवाकडे धाव घेतो. हा प्रसंग वर्णन करावा असं महर्षि वाल्मीकी यांना का बरं वाटलं असेल?
थोडा विचार करता असं लक्षात येतं की, आपण सध्या टीम बिल्डिंग अर्थात संघटन कौशल्य याविषयी खूप चर्चा करतो. यासाठी अनेक प्रशिक्षण वर्गही होतात. त्यापैकी एका महत्त्वाच्या मुद्दय़ावर महर्षि वाल्मीकी भाष्य करत असावेत. हा मुद्दा म्हणजे एकत्र येऊन यश साजरे करणे. त्यासाठी आपल्या टीमला थोडा वेडेपणा करावासा वाटला तरी तो करू देणे. ही गोष्ट वरवर पाहता फार क्षुल्लक वाटते, पण प्रत्यक्षात अतिशय परिणामकारी ठरते. संघटना बांधत असताना ज्याप्रमाणे शिस्त हवी तसेच कौतुकही हवे. आपण एक संघ म्हणून काम करत असताना सगळ्यांनी मिळून मजा करणेही अपेक्षित असते. त्यामुळे एकीची भावना निर्माण होते. खरे तर अजून मुख्य युद्धाला सुरुवात व्हायची आहे, पण त्याआधी मिळालेले हे तुलनेने छोटे यश साजरे करणे ही पुढील आव्हानांची तयारी आहे. आपल्या नेत्याचे आपल्यावर प्रेम आहे. तो आपली कदर करतो हे कळण्याचा हा मार्ग आहे. अर्थात ह्या अशा उत्सवी वातावरणात हरवून जाणे योग्य नाही. कोणत्याही गोष्टीला मर्यादा हवीच. (म्हणूनच हनुमंत, अंगद हे तिथे उपस्थित आहेत, पण सहभागी नाहीत.) पण अशी अधून मधून मिळणारी शाबासकी मोलाची असते. दधिमुख जेव्हा वानरसेनेची तक्रार घेऊन गेला तेव्हा सुग्रीव आता खूप रागावेल, वानर सेनेला शिक्षा सुनावेल असे त्याला वाटत होते. पण सुग्रीव म्हणाला की, ते एवढा अतिक्रम जर करत आहेत याचा अर्थ ते कार्य पूर्ण करून आले आहेत. तिथे जर हनुमंत उपस्थित आहे तर मग मी विरोध करण्याचे कारण नाही. थोडे नुकसान झाले तरी हरकत नाही. माकडांना आनंद घेऊ दे.
दधिमुखालाही नंतर पटले की, अंगद आणि हनुमंत वानर सेनेला बक्षीस देत आहेत आणि तो मधुवनात परतल्यावर त्याचेही वागणे बदलले आहे आणि मजामस्ती करून झाल्यावर वानर सेनाही भानावर आली आहे. पण या गोष्टीचा रामायणात आवर्जून उल्लेख होतो ही गोष्ट वैशिष्टय़पूर्ण म्हटली पाहिजे. सतत शिस्तीचे वातावरण हवे असे नाही. त्याबरोबर कधी असे कौतुक सोहळेसुद्धा हवेत. अगदी मोठय़ा कंपन्यांपासून ते आपल्या कुटुंबातही आपण सगळ्यांनी एकदिलाने काम करताना हा मंत्र लक्षात ठेवायला हवा, हो ना?
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)