लोकल यातना संपता संपेनात, हार्बर विस्कळीत प्रवाशांचे हाल

लोकल यातना सुरूच आहेत. नेरुळ स्थानकावर आज ऐन गर्दीच्या वेळी तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर आणि ट्रान्स हार्बरची लोकल सेवा एक तास विस्कळीत झाली. त्यामुळे फलाटांवर तुफान गर्दी झाली. या बिघाडाचा फटका पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेल ते ठाणे मार्गावर जाणाऱया प्रवाशांना बसला. मध्य रेल्वे प्रशासनाने अनेक लोकलगाडय़ा वाशी रेल्वे स्थानकातूनच माघारी वळवल्याने प्रवाशांनी रुळांवरून पायपीट करतच पुढचे स्टेशन गाठले.

नवी मुंबई येथील ऐरोली, रबाळे, घणसोली आणि तुर्भे भागात मोठय़ा प्रमाणावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे कर्जत, कसारा आणि मुलुंड, भांडुप, मुंबई उपनगरातील लाखो प्रवासी रोज ठाणे रेल्वे स्थानकातून ट्रान्स हार्बरमार्गे नवी मुंबईत जातात. आज सकाळी नेरुळ स्थानकाजवळ सकाळी 8 वाजताच ऐन गर्दीच्या वेळी सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्याचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीला बसला. लोकल गाडय़ा एकापाठोपाठ एक थांबल्या होत्या. त्यामुळे चाकरमान्यांनी लोकलमधून उतरून पायपीट करत पर्यायी वाहतूक शोधण्यासाठी धावाधाव केली.

एक तास गोंधळ आख्यान

तांत्रिक बिघाडामुळे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर एक तास गोंधळ आख्यान सुरू होते. प्रवाशांची फलाटावर तुडुंब गर्दी झाली होती. या गर्दीमुळे महिला प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सकाळी पावणेनऊच्या सुमारास दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. मात्र दुरुस्तीत अधिक वेळ गेल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला. पनवेल अप आणि डाऊन लोकल तब्बल पाऊण तास उशिराने धावत होत्या. ट्रान्स हार्बर मार्गावरही तीच परिस्थिती होती.

– ऐन सकाळी गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. जुईनगर, नेरूळ, सीवूड, सीबीडी बेलापूर, खारघर, खांदेश्वर, मानसरोवर, पनवेल या स्थानकांमध्ये मोठी गर्दी झाली.