घाटंजी शहरात शेतकऱ्याच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सोटा मोर्चा

>>प्रसाद नायगावकर

केंद्रातील मोदी सरकारचे शेतीविषयक धोरण शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. मोदी सरकारचे अडाणी, अंबानी सारख्या आपल्या मित्रांना जगातील श्रीमंताच्या यादीत नेऊन बसविले तर दुसरीकडे देशातील शेतक-यांना मात्र लाचार बनविल्याची घनाघाती टिका करीत शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी घाटंजी येथे घाटंजी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे सोटा मोर्चा काढण्यात आला, याप्रसंगी केंद्र तसेच राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरण्यात आले. राज्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने लाखो हेक्टर शेतातील पिके संपुष्टात आली आहे.

सरकार मात्र राज्यात एक लाख हेक्टर वरील पिकांना नुकसान झाल्याचे सांगत आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात एक लाख 25 हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सत्ताधारी गांजा पिऊन नुकसानीची पाहणी करतात काय? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. यावर्षी खरीप हंगामात सुरूवातीला पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याला दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर अतिवृष्टीने कापूस, सोयाबिन, तुरीचे प्रचंड नुकसान झाले. आता शेतक-यांनी किडणी, लिव्हर विकले तरी ते कर्जाची परतफेड करु शकत नाही. सरकार मात्र पिक विमा कंपनी सोबत साटेलोटे करुन त्यांचे एजंट बनून मलीदा लाटण्याचा प्रयत्न करीत आहे . संपुर्ण राज्यात विदारक परिस्थिती असतांना सरकारने मात्र फक्त 40 तालुक्यात दुष्काळ जाहिर केला. रोम जळत असतांना निरो फिडल वाजवित होता ही म्हण जगप्रसिध्द आहे. इकडे आपल्या राज्यात शेतकरी मरत असतांना सत्ताधारी निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. राज्यातील खोके सरकार सत्तेत आल्यापासून त्यांना शेतक-यांना वाचविण्यापेक्षा आपला पक्ष वाचविण्यात अधिक रस आहे. मंत्रालय, विधानभवन पुर्नविकास कार्यक्रमासाठी कोटयवधी रुपये खर्च करण्याची तयारी केली जात असतांना दुसरीकडे नुकसानग्रस्त शेतक-यांना मदतीपासून कसे वंचीत करता येईल याचीही व्युहरचना आखली जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात हलाखीच्या परीस्थितीने शेतकरी आत्महत्या करीत आहे तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र आपल्या मुलाच्या हट्टापायी शेतक-यांना मदत करायचे सोडून महागड्या गाड्यांचे प्रदर्शन भरविण्यात अधिक रस दाखवतात ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची टीका यावेळी करण्यात आली. हातात सोटे घेतलेल्या शेतक-यांचा मोर्चा वाजता गिलाणी महाविद्यालयापासून निघून तहसील कार्यालयावर धडकला. शेतक-यांनी सरकारविरोधी घोषणा देऊन परीसर दणाणून सोडला.

यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, सोयाबीनसाठी सरसकट हेक्टरी 50 हजार तर कपसासाठी 75 हजार रुपये मदत जाहीर करा, कापसाला प्रती क्विंटल 12 हजार रुपये तर सोयाबीनला 8 हजार रुपये भाव द्या, कापूस, सोयाबीन व सर्वच पिकांना पीकविमा जाहीर करा, लोडशेडींग पूर्णत: बंद करा, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून सुटलेल्या पात्र शेतकऱ्यांना तात्काळ दरमहा दोन हजार रुपये लागु करा, छत्रपती शिवाजी महाराज किसान सन्मान योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज माफीचा लाभ द्या, नियमित कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला 50 हजार रुपयाचा प्रोत्साहन निधी तात्काळ द्या, पीक कर्जासाठी लागू करण्यात आलेली सीबील ची (CIBIL) अट तात्काळ रद्द करा, जंगली जनावरांचा समूळ बंदोबस्त करा, पिकांची नासाडी करणाऱ्या जंगली डुकरांना मारण्याचा परवाना द्या यासह विविध मागण्यांसाठी आज घाटंजी येथे शेतकरी हातात सोटे घेऊन रस्त्यावर उतरले. खरीप हंगामात प्रचंड नुकसान झाले असतांना शेतकऱ्यांच्या खात्यात 2 रुपये, 5 रुपये, 35 रुपये अशी तुटपुंजी मदत जमा करण्यात आली. त्यामुळे सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा प्रश्न करीत देवानंद पवार (सरचिटणीस संघटन व प्रशासन ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ) यांनी सरकारला विचारला . पर्याप्त मदत न मिळाल्यास सत्ताधारी नेत्यांना तसेच प्रशासनाला सोटे पडतील असा इशारा यावेळी देण्यात आला. या मोर्चाने नागरीकांचे लक्ष वेधून घेतले.

या मोर्चात शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर, शैलेष इंगोले अध्यक्ष घाटंजी तालुका कॉग्रेस कमेटी, संजय डंभारे अध्यक्ष घाटंजी तालुका किसान कॉग्रेस, प्रा. विठ्ठल आडे, बाबा जाधव, कोच्च्या रेड्डी, गंगय्या रेड्डी, हेमंत कांबळे, सय्यद शब्बु, गजानन पातोडे, सुधीर महल्ले, पंकज मांडवगडे, रणजीत जाधव, जयवंत आडे, अमोल बेले, युसूफ पठान यांच्यासह हजारोच्या संख्येत शेतकरी सहभागी झाले होते. तहसिलदार शेलवटकर यांनी मोर्चा स्थळी येऊन निवेदन स्विकारल्यानंतर मोर्चाची सांगता झाली.