एअर इंडियाच्या उड्डाणात तीन तासांहून अधिक विलंब, सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एअर इंडियाच्या खराब सेवेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या एअर इंडिया उड्डाण AI 2971 मध्ये तीन तासांहून अधिक विलंब झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. याच विमानाने त्याही प्रवास करत आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत X वर एक पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी एअर इंडियाच्या गैरव्यवस्थापनावर आणि प्रवाशांप्रती उदासीनतेवर टीका केली आहे. त्यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालय आणि मंत्र्यांना हस्तक्षेप करून एअर इंडियाला जबाबदार धरण्याची मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या एअर इंडियाच्या उड्डाण AI 2971 ने प्रवास करत होत्या. मात्र हे विमान उड्डाण करण्यासाठी तीन तासांहून अधिक काळ उशिराने निघाले. या विलंबाबाबत एअर इंडियाकडून प्रवाशांना कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही.

सुप्रिया सुळे याबाबत X वर पोस्ट करत म्हटलं आहे की, प्रवाशांना उत्तम सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यांनी म्हटले, “एअर इंडियाची ही उदासीनता अस्वीकार्य आहे. प्रवाशांना अडकून पडावे लागते आणि त्यांना कोणतेही सहाय्य मिळत नाही. याबाबत तातडीने कारवाई करून प्रवाशांना न्याय मिळाला पाहिजे.” त्यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालय आणि टाटा समूहाकडे या समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली आहे.