
>> तरंग वैद्य
कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला हाथीराम चौधरी, खऱया गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी त्याने केलेला तपास, गुन्हेगार, पत्रकार, सीबीआयच्या भूमिका अशी सशक्त कथा असलेली पाताल लोक वेब सीरिज तुफान लोकप्रिय ठरली.
‘पाताल लोक’ नावातच एक वेगळेपण आहे, तसेच ‘पाताल लोक’ नावाच्या वेब सीरिजमध्येही. पोलीस तपास कथेवर आधारित अॅमेझॉन प्राईमवरील ही वेबसीरिज सशक्त कथा व जयदीप अहलावत या गुणी अभिनेत्याच्या अभिनयाच्या जोरावर खूप गाजली.
चार युवक एका हॉटेलमधून गाडीतून निघतात. पोलिसांच्या गाडय़ा त्यांचा पाठलाग करतात आणि एका पुलावर त्यांच्या गाडीला अडवून त्यांना जेरबंद करतात. योगायोगाने तिथे मीडियाची ओबी व्हॅन असते आणि संपूर्ण नाटय़ चित्रित केले जाते, अगदी त्या चारमधला एक त्याच्या जवळ असलेला पिवळा मोबाईल नदीत भिरकावून देतो हेसुद्धा. आता हे चौघे कुठे जात होते, त्यांचा उद्देश काय होता, त्या फोनमध्ये असे काय गुपित दडले होते याचा शोध लावण्यासाठी हा तपास ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला, त्या दिल्ली आऊटरच्या अशा अधिकाऱयाला सोपवण्यात येतो, ज्याला असल्या तपासाचा अजिबात अनुभव नसतो. या अधिकाऱयाचे नाव असते हाथीराम चौधरी अर्थात जयदीप अहलावत, जो मिळालेल्या संधीचे सोने करायचे असे ठरवून कामाला लागतो.
पण तपासादरम्यानची काही गुपिते उघड झाल्यामुळे पोलीस खात्यावर ठपका येतो. हाथीरामला नोकरीतून निलंबित करण्यात येतं आणि केस सीबीआयकडे सोपवली जाते.
हाथीराम आणि त्याचा सहकारी अन्सारी प्रशासनाच्या या निर्णयामुळे दुःखी होतात. निलंबन म्हणजे आपल्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह ही भावना हाथीरामला आतून खात असते. सीबीआय गतीने हालचाल करून या कटाच्या मागे अतिरेकी गटाचा हात, पाकिस्तान, नेपाळची भूमिका दाखवत त्या चौघांना अतिरेकी ठरवून जनतेसमोर केस सोडवली असे सांगत आपली पाठ थोपटवून घेतात. ही बाब हाथीराम आणि अन्सारीला पचनी पडत नाही. कारण त्यांच्या तपासाच्या वेळेस त्यांना असे काहीच आढळलेले नसते आणि हत्येचा हेतू वेगळाच असून यामागे वेगळेच लोक आहेत हे त्यांच्यासाठी पाण्यासारखे पारदर्शक असते. हाथीराम ठरवतो की, त्या चौघांनी गुन्हा केलाय. त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे, पण अतिरेकी हा ठपका त्यांच्यावर नसला पाहिजे, त्यासाठी तो पुढे सरसावतो. निलंबनामुळे त्याच्याकडे अधिकार नसतात आणि यंत्रणेचे सहकार्यही. तरीही तो जिद्दीने कामास लागतो. हाथीराम यशस्वी होतो का, खरे गुन्हेगार कोण असतात याचा शोध घेत ‘पाताल लोक’ची कथा पुढे सरकते.
गुह्याचा तपास घेणं किती मेहनतीचं काम असतं हे इथं दाखवलं आहे आणि सगळेच पोलीस वाईट नसतात, उलट वाईट खूप कमी असतात हे दाखवले आहे.
पटकथा सशक्त आहे, शोधकार्यात वेगवेगळ्या वळणांवर बरंच काही घडतं, ज्यामुळे प्रेक्षक गुंतून राहतो हे मालिकेच्या यशाचे रहस्य आहे. अभिनयाबद्दल बोलायचे तर जयदीप अहलावत अभिनय सम्राटाप्रमाणे वावरलाय. त्याची जिद्द, हताशा, निराशा, प्रयत्न, लढा अगदी सहज दिसतो. नीरज काबी संजीव मेहराच्या भूमिकेत शोभतो. हाथीरामचा सहकारी म्हणून ईश्वाक सिंग भाव खाऊन जातो. अभिषेक बॅनर्जीला या मालिकेचा खूप फायदा झाला. त्याने रंगवलेला ‘हथोडा त्यागी’ खूप गाजला. बाकी विपीन शर्मा, आसिफ बसरा, राजेश शर्मा आपापल्या भूमिकेत योग्य. गुल पनागने हाथीरामच्या बायकोच्या भूमिकेला न्याय दिला आहे. स्वस्तिका मुखर्जी मेहराच्या पत्नीच्या भूमिकेत आहे आणि ‘उत्तम’ असे त्यांचे काम आहे. 43 ते 53 मिनिटांचे 9 एपिसोड चुकवू नयेत असेच आहेत. त्यामुळे नक्कीच बघा.