
ऐन पावसाळ्यात ठाणे शहरात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. 18 आणि 19 जून या दोन दिवसांमध्ये स्टेम प्राधिकरणाकडून तब्बल 12 तासांचा शटडाऊन घेतला जाणार आहे. अत्यावश्यक दुरुस्तीसाठी हा शटडाऊन घेण्यात येणार असून त्यामुळे ठाण्यातील काही महत्त्वाच्या भागांचा पाणीपुरवठा 12 तास बंद राहणार असल्याने ऐन पावसाळ्यात ठाणेकरांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.
ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा अत्यावश्यक दुरुस्ती कामामुळे 18 जून रोजी सकाळी 9 ते 19 जून रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या काळात पालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचे व्यवस्थापन करून टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
येथे पुरवठा बंद
घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, ओवळा इत्यादी ठिकाणाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच समतानगर, ऋतु पार्क, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा व मुंब्रा येथील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा, पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.