मतचोरीचे सत्य देशासमोर आले आहे, आम्ही आमचा अधिकार मिळवणारच! राहुल गांधी यांचा निर्धार

नवी दिल्लीत मतचोरी विरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत प्रचंड मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला जनतेचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोर्चाला पोलिसांनी अडवले असून राहुल गांधी, प्रियांका गांधी संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेत त्यांना संसद मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेणार होतो. मात्र, आम्हाला अडवण्यात आले. निवडणूक आयोग चर्चेला का घाबरत आहे? आज आम्ही निवडणूक आयोगाला भेटणार होतो, तेव्हा इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना थांबवण्यात आले आणि ताब्यात घेण्यात आले. मत चोरीचे सत्य आता देशासमोर आहे. ही लढाई राजकीय नाही. ही लोकशाही, संविधान आणि ‘एक व्यक्ती, एक मत’ या अधिकाराचे रक्षण करण्यासाठीची लढाई आहे. विरोधी पक्ष आणि देशातील प्रत्येक मतदाराची मागणी आहे स्वच्छ मतदार यादी. आम्ही हा अधिकार कोणत्याही परिस्थितीत मिळवू,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.