
राजापूर तालुक्यातील सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समितीच्या निवडणुकीला सरासरी ५० ते ५५ टक्के मतदान झाले. यामध्ये जिल्हा परिषदेच्या तेरा आणि पंचायत समितीच्या ३२ अशा ४५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हिएम मशीन मध्ये बंदिस्त झाले. आता सोमवारी मतमोजणी होत असून त्यामध्ये कोण बाजी मारणार त्याची जोरदार उत्सुकता तालुकावासियांना लागून राहिली आहे.
राजापूर तालुक्यात शनिवारी सकाळी 7.30 वाजेपासून १९५ मतदान केंद्रानावर मतदान प्रक्रिया सुरु झाली होती. सुरवातीला मतदान प्रक्रिया संथगतीने सुरु होती. पहिल्या दोन तासात १०. ९१ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर पुढील चार तासात 11.30 वाजेपर्यंत २६. ६३ टक्के मतदानची नोंद झाली होती. दुपारी 1.30 वाजेपर्यंत सहा तासात ३७. ९७ टक्के मतदानची नोंद झाली होती. सायंकाळी 3.30 वाजेपर्यंत ४३.८१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. सुरवातीला काही ठिकाणी मतदान केंद्रावर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, त्यानंतर सर्व केंद्रावर सुरळीत मतदान सुरु होते. सायंकाळी मतदानची वेळ समाप्त झाली. त्यावेळी झालेल्या मतदानाची नेमकी टक्केवारी समोर आली नव्हती. मात्र अंदाजे सरासरी ५० ते ५५ टक्के मतदानाची नोंद झाल्याची शक्यता वर्तविली जात होती.
मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून सोमवारी आबासाहेब मराठे महाविद्यालयात. मतमोजणी होणार आहे. त्यावेळी कोणकोण बाजी मारणार याचीच उत्सुकता तालुकावासियांना लागून राहिली आहे.































































