वाड्यातील टायर रिसायकलिंग कारखाने दिवसा बंद; रात्री सुरू, पालकमंत्र्यांचे आदेश धाब्यावर, प्रदूषण नियंत्रण मंडळाला चुना

वडवली ग्रामपंचायत हद्दीमध्ये थाटण्यात आलेल्या टायर कंपन्यांनी परिसरातील गावकऱ्यांचे आरोग्य अक्षरशः चिरडून टाकले आहे. याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी दहा प्रदूषणकारी कारखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कारखाने बंदही करण्यात आले. मात्र हे आदेश धाब्यावर बसवून, प्रदूषण नियंत्रण मंडळाला चुना लावून हे कारखाने दिवसा बंद आणि रात्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि राज्य सरकार करते तरी काय, असा संतप्त सवाल विचारण्यात येत आहे.

विविध प्रकारच्या प्रदूषणकारी कारखान्यांमुळे वाडावासीयांचे आरोग्य आधीच धोक्यात आले असताना त्यात टायर कंपन्यांमधील ‘रबर पायरोलिसिस’ची भर पडली होती. ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने तसेच सर्व नियम धाब्यावर बसवून होत असल्याने असंख्य गावकऱ्यांची फुप्फुसे निकामी झाली आहेत. त्यातील काही जणांना तर कॅन्सरचा धोका असून ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. कारखान्यांमधून निघणारा धूर व धुळीमुळे ग्रामस्थ अक्षरशः हैराण झाले होते. फेब्रुवारी महिन्यामध्ये एम. डी. पायरोलिसेस या कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला आणि यात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. त्यात दोन कामगार व त्यांची दोन मुले ठार झाले. तेव्हा बेकायदेशीरपणे सुरू असलेले दहा प्रदूषणकारी कारखाने बंद करण्यात आले. तरीदेखील आदेशाची पायमल्ली करत हे सर्व प्रदूषणकारी कारखाने रात्री सुरू असल्याचे येथील ग्रामस्थ कल्पेश पाटील यांनी उघडकीस आणले आहे.

मी या ठिकाणी झालो आहे. पंधरा दिवसांपूर्वी हजर यासंदर्भात मला अजून पूर्ण माहिती नाही. सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल.
जे.एस. हजारे, प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ