
पावसाने दोन दिवसांपासून कोकण पट्टीला अक्षरशः झोडपले. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात कोसळलेल्या तुफानी पावसाने कोकणवासीयांची पुरती काेंडी केली. रायगड जिह्यातील माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड, पोलादपूरमधील नद्यांना पूर आला. गावागावांत पाणी घुसले. अनेक गावांचा संपर्क तुटला. आधीच खड्डय़ात गेलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची तर नागोठण्याजवळ नदी झाल्याचे भीषण चित्र होते. रस्त्यावर समुद्राप्रमाणे लाटा उसळत होत्या. पूरस्थितीमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.
मुंबई उपनगरांत धुमाकूळ
मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोरदार पावसाने झोडपून काढले. पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या पावसामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. तर पूर्व उपनगराच्या अनेक भागांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अंधेरी सबवेमध्ये तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचल्याने हा सबवे तब्बल चार तास वाहतुकीसाठी बंद होता. तर पाणी तुंबल्याने ‘बेस्ट’कडूनही काही मार्ग वळवण्यात आले.