मुंबई गिळायाचा प्रयत्न करणाऱ्या अ‍ॅनाकोंडाचं पोट फाडून बाहेर येईन; निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरे मोदी, शहांवर बरसले

“मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा आहे. आज एक जण येऊन गेला. सामनात दोन बातम्या पाहिल्या, पहिल्या पानावर बातमी होती, भाजप कार्यालयाचं भूमिपूजन, आत बातमी आहे, जिजामाता उद्यानात अ‍ॅनाकोंडा येणार. आपण पेंग्विन आणले. काही पेंग्विनच्या बुद्धीचे लोक आपल्यावर टीका करतात. ते सोडा. अ‍ॅनाकोंडा म्हणजे सर्व गिळणारा साप, तो येऊन गेला, त्यांना मुंबई गिळायचीय, पण ते मुंबई कशी गिळतात ते बघतोच, नाही पॉट फाडून बाहेर आलो तर नावाचा नाही”, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भव्य निर्धार मेळावा वरळी येथील एनएससीआय डोममध्ये पार पडला आहे. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते असे म्हणाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की, “मुंबईत भूमिपूजन करण्यासाठी आले आहात, मग करा. नारळ फोडा, डोक्यावर फोडा किंवा दगडावर, एकच आहे. पण ते करताना सुद्धा घराणेशाहीवर टीका. म्हणजे यांचं कराटं तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्ष झालं आहे, ते यांच्या क्रेडिटने झालं आहे आणि घराणेशाही कोणाची? ठाकरेंची? समोर उभं राहून दाखवा. त्या अब्दालीला मला सांगायचं आहे की, आम्ही आमच्या आई-वडिलांचे ऋण मानणारे घरणाच्या परंपरेचे पाईक आहोत, वारसदार आहोत. संजय राऊत म्हणाले तसं, तुमची ब्रह्मचाऱ्याची पिलावळ तशी आमची घराणेशाही नाही. एक एक ब्रह्मचाऱ्याला चाळीस-चाळीस पोरं, झाली कशी? ब्रह्मचाऱ्याला चाळीस पोरं होत असतील तर मला तुकाराम महाराजांचा अभंग आठवला आणि तीच परिस्थिती भाजपची झाली आहे. गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्य गेलं. जसा मी दसऱ्याच्या मेळाव्यात तुम्हाला सांगितलं होता सर्दभ, तसा याचा संदर्भही तुम्ही शोधा. तुकाराम महाराज असं का म्हणाले होते. गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्य गेलं, अशी आज भाजपची परिस्थिती आहे. “

उद्धव ठाकरे म्हणाले की, “लोकशाहीत मतदार सरकार निवडतात. आताची परिस्थिती अशी आहे की, सरकार मतदार निवडत आहेत. कोणी मतदान करायचं, कोणी नाही करायचं, हे आता सरकार ठरवत आहे. याला उडवा किंवा कोणी वरती गेलं असलं तरी त्याला सर्वपित्र म्हणून खाली आणा, असे बोगस प्रकार यांचे सुरु आहेत. म्हणून उपशाखाप्रमुखांना खास बोलावलं आहे. बरोबर शाखाप्रमुखांना, उपविभागप्रमुख आणि विभागप्रमुख आहेत. काय करायचं? एका यादीत साधारणपणे १२०० नावे आहेत. १२०० म्हणेज ४०-४० नावांची घरे सोडली तर, चार ते पाच जणांचं एक कुटुंब धरलं तर, ३०० घर होतील. यातच तुमच्यापैकी सगळेजण आपल्या गटप्रमुखांची टीम घेऊन ३०० मतदार यादीचं वाचन करा. नाव, चेहरे, पत्ते योग्य आहेत का तपासा, हे आजपासून सुरु करा.”

ते म्हणाले, “उपशाखाप्रमुखांनी दोन ते तीन गटप्रमुखांना रोज भेटून, शाखाप्रमुखांनी उपशाखाप्रमुखांना भेटून, उपविभागप्रमुखांनी शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुखांना भेटून आणि विभागप्रमुखांनी शाखाप्रमुखांना भेटून, उपविभागप्रमुखांना भेटून रोज आज तुम्ही काय केलं, किती घरात जाऊन आलात, किती बरोबर नावे सापडले आहेत? किती बोगस सापडले आहेत. बरोबर नावानिशी आणि चेहऱ्यानिशी मतदार आहेत की नाही? हे तपासा. तसेच निवडणुकीच्या दिवशी आपले पोलिंग एजेंट असे असेल पाहिजे की, त्याच्या हातात मतदार यादी फोटोनिशी हवी. तसेच नुसता मतदार यादीतील फोटो बघून नाही तर, चेहऱ्यानिशी मतदाराला ओळखणारा माणूसच पोलिंग एजेंट असला पाहिजे. यातच जर तुम्हाला वाटलं यात गडबड आहे, हा मतदार बोगस आहे, याची खात्री पटली, तर त्याला थोबडवा, फटकवा.”

निवडणूक आयोगाला इशारा देत उद्धव ठाकरे म्हणाले की, “एक चहावाला पंतप्रधान झाला, आम्ही पाठींबा दिला म्हणून पंतप्रधान झाला. निवडणूक आयोगाला सांगतोय, ह्या गोष्टी सुधरवा नाहीतर निवडणुका होणार की नाही ते आम्ही ठरवू.”

“अमित शहांना मी आव्हान देतो. तुम्ही मुंबईत येऊन गेले. निवडणुकीनंतर मुंबई भगवी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करायचे ते करा, कितीही डोकं आपटा. डोकी फुटतील पण भगवा फुटणार नाही. तसेच शिवरायाच्या मावळ्याला कुणी डिवचायचे नाही. डिवचलं तर प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचा इतिहास लिहिला आहे. त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी आम्ही तयार आहोत. भाजपाने कितीही प्रयत्न केला तरी आम्हीच मुंबई पालिकेची निवडणूक जिंकणार”, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.