लाडक्या बहिणींसाठी निधीच्या पळवापळवीनंतर, वारकरी दिंड्यांच्या अनुदानासाठी सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर डल्ला

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला निधी कमी पडू लागल्याने सामाजिक न्याय विभागाचा निधी यापूर्वी एकदा पळवल्यानंतर आता आषाढी यात्रेच्या दिंडय़ांनाही निधी कमी पडल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे वारकऱयांच्या दिंडय़ांना अनुदान देण्याचा खर्चही आता सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून देण्याची वेळ महायुती सरकारवर आली आहे.

आषाढीच्या निमित्ताने पंढरपुरात दाखल होणाऱया राज्यातील 1 हजार 109 दिंडय़ांना राज्य सरकारने प्रत्येकी 20 हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. सरकारने या अनुदानाचा खर्च गेल्या वर्षीप्रमाणे सामाजिक न्याय विभागाच्या माथी मारला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱया प्रत्येक दिंडीला 20 हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर यंदा 6 जुलैच्या आषाढी एकदशीसाठी दिंडय़ांना 20 हजार रुपयांचे अनुदान देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले होते. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवला

लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सरकारच्या तिजोरीत निधीच शिल्लक राहिला नाही. त्यामुळे विविध विभागांच्या निधीची पळवापळवी सुरू आहे. यापूर्वी लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभाग व सामाजिक न्याय विभागाचा 746 कोटी रुपयांचा निधी पळवला आहे. आता पुन्हा सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर डल्ला मारल्याचे उघड झाले आहे.

  • 1 हजार 109 दिंडय़ांना प्रत्येकी 20 हजार रुपये याप्रमाणे एकूण 2 कोटी 21 लाख 80 हजार रुपये वितरित करण्यास विभागाने मान्यता दिली आहे. पुणे विभागीय आयुक्तांनी अनुदान वितरणाची कार्यवाही करावी, असे शासन निर्णयात नमूद केले आहे.