सत्तापिपासून भाजपा मृतदेहावरून रॅली काढतंय काय? विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल

मुंबईमध्ये होर्डींग दुर्घटना घडली आहे. भ्रष्ट महायुतीमुळे या दुर्घटनेत 18 जणांना जीव गमवावा लागला आहे. तरी देखील भाजपाच्या रॅली, रोड शो थांबत नाहीत. सत्तापिपासू भाजपाचा संवेदनशिलपणा संपला आहे. खरंतर ही घटना घडल्यानंतर भाजपने रॅली रद्द करायला हवी होती. पण भाजपाला रॅली काढून आनंद मिळताना दिसतोय, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर टिकास्त्र डागले आहे. त्याचबरोबर  होर्डींग दुर्घटना स्थळाजवळून पंतप्रधानांची रॅली भाजप काढत आहे. भाजपा मृतदेहावरून रॅली काढतंय काय? असा संतप्त सवाल देखील वडेट्टीवार यांनी केला आहे.
मुंबई येथील गांधी भवन काँग्रेस पक्ष कार्यालयात बुधवारी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  वडेट्टीवार म्हणाले की, बुधवारी मुंबईत मोदींचा रोड शो होतोय आणि राज्यात 24 वी सभा घेतली जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा एखादा नेता एवढ्या सभा घेत नाही. तेवढ्या सभा या राज्यात मोदी घेत आहेत. याचा अर्थ असा आहे की, राहुल गांधी यांची मोदींना भिती वाटते. महाविकास आघाडी 35 जागा जिंकणार आहे. त्यामुळे भाजपा घाबरली आहे. नाशिकमध्ये पंतप्रधानांनी सभा घेतली पण कांदा प्रश्नावर ब्र सुद्धा काढला नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची या राज्यात पिळवणूक केली जात आहे. ही वस्तुस्थिती आहे.
सध्या मोदींची तळी उचलण्याची स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधानांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप घातला. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. हा जिरेटोप फक्त शिवाजी महाराजांच्या डोक्यावर शोभतो. महाराष्ट्रच्या अस्मितेची जाण पटेलांना नसावी म्हणून हे कृत्य केले आहे. प्रफुल पटेल यांचे दहशवाद्यांशी संबंध होते. असे भाजपाने आरोप केले होते. त्यांच्या मागे ईडी लावली होती. तरी देखील त्यांच्या हातून जिरेटोप कसा परिधान केला,असा सवाल देखील वडेट्टीवार यांनी केला आहे. आता जिरेटोप घातल्यानंतर प्रफुल पटेल माफी मागणार आहेत का? असा सवाल करत फक्त ट्वीट करून तुमचा उद्देश सफल होणार नाही असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
होर्डींग दुर्घटनेला मुंबई महापालिका आणि सरकार जबाबदार आहे. जी क्रेन घटनास्थळी लवकर जायला हवी होती ती मंगळवारी गेली. आता महायुतीचे पाप लपविण्यासाठी भावेश भिडे नावाच्या व्यक्तीचे फोटो समोर आणले आहेत. कोणाचे फोटो कोणासोबत असू शकतात त्यामुळे काही फरक पडणार नाही. प्रतिमा मलिन करण्याचा भाजपाचा जुना डाव आहे. पण जनता आता भाजपाला ओळखून आहे. या सगळ्या घटनेची उचस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमच्याकडून केली असल्याचे वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.