![vijay wadettiwar photo new](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/01/vijay-wadettiwar-photo-new-696x447.jpg)
मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्याच्या खोट्या स्वाक्षरी आणि शिक्के असलेली बनावट निवेदने आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयात अशाप्रकारच्या घटना होतात हे गंभीर आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ‘पॉंईट ऑफ इनफॉर्मेशन’च्या वेळी वडेट्टीवार बोलत होते.
वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्री कार्यालयात यापूर्वी सुद्धा विशेष कार्यकारी अधिकारी सहा महिने तोतया म्हणून कार्यरत होता. जर राज्याचा कारभार ज्या ठिकाणाहून चालतो त्या मंत्रालयातच तसेच मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानामध्ये राजरोसपणे तोतया विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून वावरत होता. इतकेच नव्हे तर त्या तोतयाने आठ महिन्यात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या सुद्धा केल्या. कर्मचाऱ्यांच्या बदल्या, शासकिय दस्तऐवज यांमध्ये हस्तक्षेप तो करत होता. स्वतः फाईल घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जायचा आणि स्वाक्षरी घेऊन यायचा. तो खरा आहे की खोटा विशेष कार्यकारी अधिकारी आहे हे देखील मुख्यमंत्र्यांना माहीत नव्हते ही अतिशय दुर्दैवी आणि चिंतेची बाब आहे.
हा सर्व गोंधळ बघता राज्यात किती मोठ्या प्रमाणात अनागोंदी सुरू आहे सर्व जनतेला दिसत आहे. हे सर्व नेमकं चाललंय काय? याकडे शासन जबाबदारीने बघणार आहे की नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत महाराष्ट्राचे धिंडवडे काढण्याचा हा प्रकार असल्याचे सांगून वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री, उपपमुख्यमंत्री देखिल डुप्लिकेट आणा असे तीव्र ताशेरे सरकारच्या कार्यपद्धतीवर ओढले.
या प्रकरणाची राज्यसरकारने गंभीरतेने दखल घेतली असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवाय त्याचा तपास सुरु आहे. याप्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टीकरण सरकारकडून यावेळी देण्यात आले.