
खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेने जागतिक पातळीवरील ‘टी फोर एज्युकेशन’ या संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइज’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन’मध्ये जागतिक पातळीवरील सर्वोत्तम 10 शाळांमध्ये स्थान मिळविले आहे.
‘लोकसहभागातून शाळा विकास’ या स्पर्धेच्या विभागांमध्ये जिल्हा परिषदेची ही शाळा सहभागी झाली होती. आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांनी या आव्हानात्मक स्पर्धेमध्ये शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या जगभरातील लाखो शाळांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर जिल्हा परिषद शाळा जालिंदरनगर या शाळेस यश मिळत गेले व अंतिमतः मागील आठवड्यात उपरोक्त संस्थेकडून प्राप्त झालेल्या ई-मेलमधील सूचनेनुसार आपल्या शाळेने या वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉ म्पिटिशनमध्ये जागतिक पातळीवरील सर्वोत्तम दहा शाळांमध्ये स्थान मिळवले आहे. आज जागतिक पातळीवर लाईव्ह कार्यक्रमांमध्ये याबाबतची घोषणा करण्यात आल्याची माहिती वारे गुरुजी यांनी दिली. या घोषणेनंतर पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी शाळेमध्ये आनंदोत्सव साजरा केला .
अशाप्रकारचे यश साध्य करणारी आपल्या राज्यातीलच नव्हे, तर देशातील ही पहिलीच सरकारी शाळा आहे. तसेच यावर्षीच्या ‘लोकसहभागातून शाळा विकास’ या स्पर्धेच्या विभागामध्ये जिल्हा परिषदेची जालिंदरनगरची शाळा ही देशातील एकमेव शाळा आहे. पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील एका सरकारी शाळेने जागतिक पातळीवर सर्वोत्तम कामगिरी करणे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसेच समाजाचा सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन या निमित्ताने नक्कीच बदलेल व सकारात्मकता निर्माण होईल, असा विश्वास वारे गुरुजी यांनी व्यक्त केला.
व्होटिंगसाठी आवाहन
जालिंदरनगरची जिल्हा परिषदेची शाळा ‘टॉप-10’ शाळांमध्ये आलेली आहे. स्पर्धेच्या या पुढील टप्प्यात या 10 शाळांमध्ये सर्वोच्च शाळा निवडून तिला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. मात्र, त्या प्रक्रियेसाठी पब्लिक व्होटिंगची अट ठेवण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच एखादी सरकारी शाळा सहभागी झालेली आहे. शिवाय पहिल्या 10 शाळांमध्ये हीच एकमेव देशातील पहिली शाळा आहे. या शाळेने यश मिळविणे ही एकंदर सरकारी शिक्षणव्यवस्थेसाठी व आपल्या देशाच्या अभिमानासाठी महत्त्वाचे आहे. पब्लिक व्होटिंगची प्रक्रिया आम्हाला आमच्या क्षमतेबाहेरची वाटते. त्यामुळे यापुढील प्रक्रियेमध्ये आपल्या मदतीची आवश्यकता आहे, असे आवाहन दत्तात्रेय वारे गुरुजी यांनी केले आहे.