अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ पूर्वपदावर, पहिल्याच दिवशी अडीच लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

गेले काही दिवस तांत्रिक गोंधळामुळे रखडलेले अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ पूर्वपदावर आल्याने पहिल्या दिवशी 2 लाख 58 हजार 887 विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता आली.

राज्यात प्रथमच केंद्रीभूत पद्धतीने (क@प) अकरावीचे ऑनलाईन प्रवेश केले जात आहेत. सोमवारी सकाळी 10 वाजता प्रवेश प्रक्रियेकरिता ऑनलाईन नोंदणी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले. पोर्टलच्या माध्यमातून आज पहिल्या दिवशी 2 लाख 58 हजर 887 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती शिक्षण संचालक तथा अध्यक्ष, राज्यस्तर प्रवेश संनियंत्रण समिती (माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण) डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.

या प्रवेश प्रक्रियेत नोंदणीकृत महाविद्यालयांची संख्या 9,338 असून क@पअंतर्गत 18,74,935 जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार कमाल 10 उच्च माध्यमिक विद्यालये निवडण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावा लागणार असून अर्जात नमूद केलेल्या प्राधान्यक्रमानुसार, आराखडा आणि गुणवत्ता गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी सूचना

व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत कोटा व अल्पसंख्याक कोटय़ातून मिळालेल्या प्रवेशाच्या रद्द करण्यासंदर्भातील कार्यपद्धती विद्यार्थ्यांनी नीट समजून घ्यावी. प्रत्येक प्रवेश फेरीत विद्यार्थ्यांनी संमती अनिवार्यपणे नोंदवणे आवश्यक आहे. ज्यांना प्रथम फेरीत प्रवेश मिळणार नाही अशा विद्यार्थ्यांना पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्याची संधी असेल.

मार्गदर्शन सहाय्यता

विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना मदत मिळावी, तसेच महाविद्यालयांकडून प्रवेश प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रांची तपासणी योग्यरीत्या व्हावी यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेची माहिती ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहेत.

तांत्रिक अडचण किंवा इतर मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी सहाय्यता क्रमांक 8530955564 वर अथवा ई-मेलः [email protected] वर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. पालकर यांनी केले आहे.