वडिलांचा मृतदेह घरी नेताना रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; मुलासह 5 जण ठार, 1 गंभीर जखमी

‘फादर्स डे’च्याच दिवशी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. वडिलांचा मृतदेह घरी नेताना रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये मुलासह पाच जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. अमेठीतील पूर्वांचल राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

हरयाणातील फिरोजपूर येथे राहणाऱ्या अशोक वर्मा यांचा दिल्लीत अपघाती मृत्यू झाला होता. ते मूळचे बिहारच्या समस्तीपूर येथील रहिवासी होते. वडिलांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच त्यांचा मुलगा राजकुमार याने गावातील मित्र आणि नातेवाईकांसह दिल्लीत धाव घेतली. कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर अशोक वर्मा यांचा मृतदेह घेऊन ते रुग्णवाहिकेने मूळ गावी निघाले होते.

राजकुमार शर्मा (वय – 26), गावातीलच रहिवासी असलेला रवी वर्मा (वय – 28), त्यांचे नातेवाईक फुलो शर्मा (वय – 45), शंभू राय (46) यांच्यासह वाहनचालक आबिद (वय – 28) आणि सरफराज (वय – 30, रा. नूह, हरयाणा) असे सहा जण रुग्णवाहिकेतून अशोक वर्मा यांचा मृतदेह गावी घेऊन जात होते. रविवारी पहाटेच्या सुमारास उत्तर प्रदेशमधील अमेठी जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्वांचल राष्ट्रीय महामार्गावर या रुग्णवाहिकेचा अपघात झाला.

भरधाव वेगात असलेल्या रुग्णवाहिकेने पिकअपला मागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की रुग्णवाहिकेचा पार चेंदामेंदा झाला असून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस आणि बचाव पथकाने दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले आणि अपघाताची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली.

पिकअप चालकाने सांगितले नक्की काय घडले?

पिकअप चालक विजय सिंह यांनी सांगितले की, ते माशांनी भरलेली गाडी कानपूरहून सिलिगुडीकडे निघाले होते. पूर्वांचल राष्ट्रीय महामार्गावर गाडीचे चाक पंक्चर झाले, त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. याचवेळी अचानक 120 किलोमीटर प्रति तासाच्या स्पीडने आलेली रुग्णवाहिका पिकअपडा धडकली. यात पाच जणांचा मृत्यू झाला.