
एआय आल्यामुळे अनेक टेक कंपन्या कर्मचारी कपात करून त्याजागी एआयकडे काम सोपवले जात आहे. आयबीएम कंपनीने एआयमुळे तब्बल 8 हजार जणांना नोकरीवरून काढून टाकले आहे. या कर्मचारी कपातीचा सर्वाधिक फटका एचआर विभागाला बसला आहे. आयबीएमने आस्कएचआर नावाची एक एआय सिस्टम डेव्हलप केली असून ही सिस्टम एचआर विभागातील अनेक काम करत आहे. या सिस्टममध्ये कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करणे, पगार तपशील आणि कर्मचाऱ्यांची कागदपत्रे हाताळते. ही सर्व कामे एचआर विभागाकडून केली जात होती, परंतु आता एआय सांभाळत असल्यामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. आयबीएमची ही नवीन सिस्टम 94 टक्के एचआरची कामे चुटकीसरशी करत आहे. या सिस्टममुळे कंपनीला 3.5 अब्ज डॉलर्सचा फायदा झाला.
आम्ही कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन एआय सिस्टम वापरली. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तामुळे उत्पादकता वाढली. आयबीएममधील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या प्रत्यक्षात वाढली आहे. कारण ऑटोमेशनमधून मिळणारी बचत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, मार्केटिंग आणि सेल्ससारख्या व्यवसायाच्या इतर भागांमध्ये गुंतवली जात आहे, असे आयबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा यांनी सांगितले. सॉफ्टवेअर अभियांत्रिकी आणि विक्रीसारख्या क्षेत्रात नवीन लोकांना कामावर ठेवण्यासाठी याचा वापर केला जात आहे. आयबीएम केवळ नोकऱ्या कमी करत नाही तर काही धोरणात्मक भूमिकांची पुनर्रचनादेखील करत आहे. मात्र मानवी हस्तक्षेपाशिवाय ही एआय व्यवस्था पूर्णपणे काम करू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
पाच महिन्यांत 61 हजार जणांनी नोकऱ्या गमावल्या
जिथे लोकांची गरज आहे तिथे काम थांबवले जाणार नाही. लोकांना काढलेही जाणार नाही. एआयचा वापर फक्त काही विशिष्ट कामांसाठी केला जात आहे. हा बदल केवळ आयबीएमपुरताच मर्यादित नाही. जगभरातील अनेक कंपन्या कामे स्वयंचलित करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी एआय-चालित साधनांचा पऱयोग करत आहेत, असे आयबीएमने म्हटले. दरम्यान, 2025 मध्ये केवळ आयबीएमच नाही तर मायक्रोसॉफ्ट, गुगल, अमेझॉन, क्लाऊड स्ट्राइक यांसारख्या अनेक कंपन्यांनीही मोठय़ा प्रमाणात नोकऱ्या काढून टाकल्या आहेत. जगभरात अशा प्रकारे 61 हजारांहून अधिक लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत.