मातंग समाज क्रांतिचक्र परिवर्तन दिन

>> बी. जी. गायकवाड

बहुजन मातंग समाजाचे लोकनेते बाबासाहेब गोपले यांनी 17 जानेवारी 1982 या दिवशी मोहनगाव (ता. कल्याण) येथे मातंग समाजाच्या इतिहासामध्ये झालेला पहिला भव्य मेळावा घेतला. याच दिवसापासून मातंग समाज उजेडात आला. अनुसूचित जातींमध्ये मातंग समाज दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा समाज गावपुसाबाहेर राहतो आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरीही स्वातंत्र्याचा प्रकाश कधीही मातंग समाजाच्या दारावर फिरकलाच नव्हता. होणारा अन्याय व वागणूक निमूटपणाने सहन करीत हा समाज कित्येक वर्षांपासून जुलमी जगत होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांच्या समाजकार्यानंतरही हा समाज मागासच राहिला होता. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास व्हावा म्हणून मातंग समाजास आपल्या हक्कांची जाणीव करून देऊन या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी 17 जानेवारी 1982 रोजी मोहनगाव (ता. कल्याण) येथे समाजाचा राज्यव्यापी पहिला मेळावा बाबासाहेब गोपले यांनी घेतला. समाज जागृतीची मशाल पेटवली. आज त्याला 43 वर्षे झाली आहेत. आज 43 वा मातंग समाज क्रांतिचक्र परिवर्तन दिन आहे.

ज्येष्ठ नेते बाबासाहेब गोपले व कुसुमताई गोपले यांनी या समाजसेवेसाठी जीवन वेचले. 1982 ते 1985 या काळामध्ये महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडे मातंग समाजाच्या विकासासाठी 21 मागण्यांचे निवेदन दिले. मंत्रालयासमोर व दिल्लीत संसदेसमोर धरणे-मोर्चे काढत मातंग समाजाला अनेक गोष्टी मिळवून दिल्या. त्यात 1) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, 2) क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग, 3)मुलुंड येथील मुलींच्या वसतिगृहातील मुलांना साळवे यांचे नाव, 4) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार यांचा समावेश आहे. मुंबईमध्ये शासनाच्या जागेवर हजारो बेघरांना घरे दिली. अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी मातंग समाज तसेच दलित व बहुजन समाजाला अनेक प्रकारे न्याय मिळवून दिलेला क्रांतिकारी नेता म्हणून बाबासाहेब गोपले यांचे नाव स्मरणात राहील.

(लेखक मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत.)